तुमचे नाव 'प्रियंका फिरोज' ठेवा; साध्वी निरंजन ज्योतींचा हल्लाबोल

ज्यांनी निष्पापांना मारहाण केली व पोलिसांवर दगडफेक केली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे की नाही?

Updated: Dec 31, 2019, 08:14 PM IST
तुमचे नाव 'प्रियंका फिरोज' ठेवा; साध्वी निरंजन ज्योतींचा हल्लाबोल title=

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री व भाजपा नेत्या साध्वी निरंजन ज्योती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींवर जोरदार टीका केली आहे. प्रियंका गांधी यांनी स्वतःचे नाव बदलून 'फिरोज प्रियंका' करावे, असे त्यांनी म्हटले. तसेच‘खोटे गांधी’ भगवा समजू शकत नाहीत, असा टोलाही साध्वी निरंजन ज्योती यांनी लगावला. 

प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याला प्रत्युत्तर देताना निरंजन ज्योती यांनी म्हटले की, ज्यांनी निष्पापांना मारहाण केली व पोलिसांवर दगडफेक केली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे की नाही? तुम्हीच त्यांना भडकवले आहे व रस्त्यांवर येण्यास सांगितले असा आरोपही त्यांनी केला. प्रियंका गांधी यांना भगवा कधीच समजणार नाही, कारण त्या खोट्या गांधी आहेत. त्यांनी आपल्या नावातून गांधी काढावे व फिरोज प्रियंका करावे, असे साध्वी निरंजन ज्योती यांनी 'एएनआय'शी बोलताना म्हटले.

उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली जात असल्याने प्रियंका गांधी यांना योगी सरकारचा त्रास वाटत आहे. जर त्या दंगली करणाऱ्यांच्या मागे असतील तर त्यांनी समोर यावे व तसे स्पष्ट करावे. ज्या प्रकारे त्यांनी योगींवर टीका केली आहे, यावरून हे दिसून येते की जे खोटी नावं वापरतात त्यांना सर्व काही तसेच दिसते. भगवा हे ज्ञान व आत्मीयतेचे प्रतिक आहे, असेही यावेळी साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आहे. मी प्रियंका गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध करतो. राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर टीका करताना भान बाळगायला हवे, याची जाण भाजपच्या नेत्यांनी ठेवावी, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.