नववर्षाला काश्मीर खोऱ्यात सुरू होतेय एसएमएस सेवा

खोऱ्यातील काही भागांत ऑगस्टमध्ये फोन सेवा सुरू करण्यात आली होती

Updated: Dec 31, 2019, 07:07 PM IST
नववर्षाला काश्मीर खोऱ्यात सुरू होतेय एसएमएस सेवा  title=

जम्मू काश्मीर : काश्मीरमध्ये नव्या वर्षाच्या निमित्तानं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ३१ डिसेंबर २०१९ च्या मध्यरात्री पासून एसएमएस (SMS) सेवा पुन्हा एकदा कार्यरत होणार आहे. याशिवाय काश्मीर खोऱ्यातील शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये इंटरनेट सेवाही सुरू केल्या जाणार आहेत. 

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर, शांतता राखण्यासाठी मोबाईल आणि लँडलाईन सेवा रोखण्यात आली होती. खोऱ्यातील काही भागांत ऑगस्टमध्ये फोन सेवा सुरू करण्यात आली होती. 

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आलं होतं. अनुच्छेद ३७० रद्द करतानाच जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन्ही भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले होते.

५ नेत्यांची सुटका

जम्मू-काश्मीरमध्ये ५ नेत्यांची सोमवारी सुटका करण्यात आली. राज्यातील अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर या नेत्यांची पहिल्यांदा सुटका करण्यात आलीय. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या दोन तर पीडीपीच्या तीन नेत्यांचा समावेश आहे.