24470 कोटींच्या योजनेचं उद्घाटन करताना मोदींचा टोला! म्हणाले, 'विरोधी पक्ष प्रत्येक...'

PM Modi While Talking On Amrit Bharat Station Scheme: पंतप्रधान मोदी या कार्यक्रमामध्ये ऑनलाइन माध्यमातून जॉइन झाले. मोदींनी यावेळेस दिलेल्या भाषणामध्ये विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी यावेळेस भारताकडे संपूर्ण देशाचं लक्ष असल्याचंही म्हटलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 6, 2023, 01:26 PM IST
24470 कोटींच्या योजनेचं उद्घाटन करताना मोदींचा टोला! म्हणाले, 'विरोधी पक्ष प्रत्येक...' title=
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला निशाणा

PM Modi While Talking On Amrit Bharat Station Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. 'विरोधी पक्ष प्रत्येक चांगल्या कामाचा विरोध करतात. विरोधकांनी संसदेच्या नव्या इमारतीचा विरोध केला. शहिदांसाठी वॉर मेमोरिएलही त्यांनी उभारले नाहीत. विरोधी पक्ष स्टॅच्यू ऑफ यूनिटीमध्ये गेले नाहीत. त्यांनी सरदार पटेल यांना वंदन केलं नाही. ते (कामं) करणार नाहीत आणि करुही देणार नाहीत,' असा टोला पंतप्रधान मोदींनी विरोधकांना लगावला.

24 हजार 470 कोटी रुपये खर्च

पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास योजनेचा शुभारंभ झाला. याच कार्यक्रमामध्ये मोदींनी हा टोला लगावला. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला हजेरी लावली. 'अमृत भारत स्टेशन योजने'अंतर्गत पंतप्रधानांनी देशातील वेगवेगळ्या प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुर्निकासाच्या कामांचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत अनेक रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा पालटणार आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वे स्थानकांचा हा सर्वात मोठा मेक ओव्हर असेल असं सांगण्यात आलं आहे. यामध्ये 27 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 508 रेल्वे स्थानके कात टाकणार आहेत. या रेल्वे स्थानकांच्या विकासाठी तब्बल 24 हजार 470 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

ईशान्य भारतात रेल्वेचं जाळ वाढवणार

"ईशान्य भारतामध्ये रेल्वेचा विस्तर करण्याला आमच्या सरकारचं प्राधान्यक्रम दिला आहे. प्रत्येक अमृत स्टेशन हे शहराचं आधुनिकीकरण, अपेक्षा आणि प्राचीन वैभवाचं प्रतिक असेल. आता ट्रेनपासून रेल्वे स्थानकापर्यंत एक वेगळाच अनुभव प्रवाशांना मिळणार आहे. आज संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर आहे. जागतिक स्तरावर भारताला फार सन्मान आहे. भारत विकसित होण्याच्या दिशेने आपली पावलं टाकत आहे. हा अमृतकाळाचा प्रारंभ आहे. नवीन ऊर्जा आपल्यासोबत आहे. नवीन प्रेरणेने आपण काम करत आहोत. नवीन संकल्प आपण सोडले आहे. आज भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्येही एक नवा अध्याय लिहिला गेला आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोणत्या राज्यांतील किती स्टेशन्सचा समावेश

24470 कोटींच्या या योजनेमध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येक 55 स्थानकांचा समावेश आहे. बिहारमधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगालमधील 37, मध्य प्रदेशमधील 34, आसाममधील 32, ओडिशामधील 25, पंजाबमधील 22, गुजरात आणि तेलंगणमधील प्रत्येकी 21 स्थानकांचा समावेश आहे. झारंखडंमधील 20, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमधील प्रत्येकी 18, हरियाणामधील 15 आणि कर्नाटकमधील 13 स्टेशनचा समावेश आहे.

रेल्वे स्टेशनवर काय काय बदलणार?

> रेल्वे स्थानकांचा सिटी सेंटर म्हणून विकास करणे
> शहरांमधील दोन्ही टोकांना जोडण्याचा प्रयत्न
> रेल्वे स्थनकांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करुन देणे
> अत्याधुनिक सुविधांना प्राधान्य देणे
> अधिक उत्तम मालवाहू व्यवस्था आणि इंटरमॉडेल इंटीग्रेशन
> मार्गदर्शनासाठी सामान आणि सहाय्य
> स्थानिक कला आणि संस्कृतीला प्राधान्य देत रेल्वे स्थानकांची सजावट