मोदी सरकारसाठी काश्मीरमधील जनता म्हणजे गिनीपिग- काँग्रेस

इतकी नाचक्की होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून का आहेत?

Updated: Sep 21, 2018, 08:46 PM IST
मोदी सरकारसाठी काश्मीरमधील जनता म्हणजे गिनीपिग- काँग्रेस title=

नवी दिल्ली: केंद्र सरकार काश्मीरमधील प्रत्येक घटकाची फसवणूक करत आहे. त्यांच्यादृष्टीने येथील जनता म्हणजे गिनीपिग असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी केले आहे. ते शुक्रवारी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सिंघवी यांनी काश्मीरमधील सद्य परिस्थितीवरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 
  
  मोदी सरकारने काश्मीरमधील जनतेचा विश्वासघात केला आहे. इतकी नाचक्की होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून का आहेत? भारताचा मुकूट असणाऱ्या काश्मीरचा सरकारने अक्षरश: खेळखंडोबा केला आहे. येथील लोकांना एखाद्या गिनीपिगसारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला. 
  
  गेल्या २४ तासांमध्ये काश्मीरमध्ये तीन पोलीस अधिकाऱ्यांची हत्या झाली आहे. तर दहा जणांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. २०१४ पूर्वी अशी परिस्थिती कधीच नव्हती. आणखी किती काळ नरेंद्र मोदी काश्मीरविषयी मौन बाळगून राहणार आहेत. पाकिस्तान पुरस्कृत हा दहशतवाद कधी थांबणार? सध्या सरकार फक्त भाषणं, सल्ले आणि घोटाळ्यांशिवाय काहीच करत नसल्याची टीका सिंघवी यांनी केली.