मोदी सरकार या २ केंद्रशासित प्रदेशांचं करणार विलिनीकरण

 लोकसभेत सादर केलं जाणार विधेयक 

Updated: Nov 23, 2019, 04:40 PM IST
मोदी सरकार या २ केंद्रशासित प्रदेशांचं करणार विलिनीकरण title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर आणि आता मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सरकार दोन केंद्र शासित प्रदेश दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली एकत्र करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी शुक्रवारी लोकसभेत या संबंधित एक विधेयक सादर केलं. त्यांनी म्हटलं की, दादरा-नगर हवेली आणि दीव-दमण विधेयक २०१९ पुढच्या आठवड्यातील प्रस्तावित कामकाजाचा भाग आहे.

गुजरातच्या किनाऱ्य़ावर असलेल्या या दोन्ही केंद्र शासित प्रदेशांना एकत्र केल्यामुळे येथे चांगलं प्रशासन मिळेल. दादरा नगर हवेलीमध्ये एक आणि दीव-दमणमध्ये २ जिल्हे आहेत.

एकमेकांपासून ३५ किलोमीटर वर असलेल्या या दोन्ही राज्यांचे स्वतंत्र सचिवालय आहे. शिवाय यांचं बजेटही वेगवेगळं आहे. पण दोन्ही केंद्रशासित प्रदेश एकत्र केल्यामुळे खर्च कमी होणार आहे.

जम्मू-काश्मीर आणि लद्दाखला केंद्र शासित प्रदेश केल्यामुळे केंद्रशासित प्रदेशांची संख्या ९ झाली होती. आता दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र केल्यामुळे ही संख्या ८ होणार आहे. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात मोदी सरकारने मोठा निर्णय घेत जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा अधिकार काढून घेतला होता. अनुच्छेद ३७० हटवत ५ ऑगस्टला संसदेत जम्मू काश्मीर पूनर्गठन विधेयक सादर करण्यात आलं होतं. ज्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लद्दाख अशी दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आली होती.