भारत-नेपाळ सीमा वादात अभिनेत्री मनिषा कोयरालाची एन्ट्री

बॉलिवूड अभिनेत्रीने केलं नेपाळंच समर्थन

Updated: May 20, 2020, 11:26 AM IST
भारत-नेपाळ सीमा वादात अभिनेत्री मनिषा कोयरालाची एन्ट्री title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यात सीमेवरुन वाद सुरू आहे. त्यावर आता बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोयरालाने वक्तव्य केलं आहे. नेपाळने कालापानी आणि लिपुलेख हे भाग नेपाळने नकाशात आपल्या देशात दाखवले आहे. याचं मनिषा कोयरालाने समर्थन केलं आहे. पण या ट्विटमध्ये तिने 3 देशांचा उल्लेख केला आहे. भारत-नेपाळ वादात तिने चीनचा उल्लेख केल्याने हा वादाचा विषय बनण्याची चिन्ह आहेत.

नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली यांच्या ट्विटवर मनिषा कोयरालाने प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटमध्ये तिने नेपाळ सरकारांचे आभार मानले आणि म्हटलं की, '(भारत, नेपाळ आणि चीन) 'तीनही महान देश' शांततापूर्ण आणि आदरपूर्ण चर्चा करतील अशी आशा करते.'

नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांचं ट्विट

यापूर्वी नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली यांनी ट्विट केले होते की, मंत्री परिषदेने देशाचे 7 नकाशे प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असून त्यात 7 प्रांत, 77 जिल्हे आणि 753 स्थानिक प्रशासकीय विभाग दर्शविले आहेत. यात 'लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी' देखील आहे. देशाच्या भूमी व्यवस्थापनाचा अधिकृत नकाशा लवकरच प्रसिद्ध होईल.'

काय आहे संपूर्ण प्रकरण

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताच्या गृहमंत्रालयाने एक नवीन नकाशा जाहीर केला. ज्यामध्ये कालापानी प्रदेशाचा देखील समावेश होता. नेपाळने भारताच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. कारण नेपाळी कालापानी आणि लिपुलेखवर दावा करत आले आहेत. 8 मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कैलास मानसरोवरच्या 80 किमी लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन केले. हा रस्ता लिपुलेक खिंडीत संपतो. नेपाळने यावर नाराजी व्यक्त केली होती.