Election 2024: आज तारखांची घोषणा! एकूण मतदार किती? बहुमताचा आकडा काय? 15 Points

Lok Sabha Election 2024 Date: केंद्रीय निवडणूक आयोग आज म्हणजेच 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर करणार आहेत. मात्र या निवडणुकीसाठी किती भारतीय नागरिक मतदान करणार आहेत? यापैकी किती पुरुष मतदार आहेत किती महिला मतदार आहेत?

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 16, 2024, 07:44 AM IST
Election 2024: आज तारखांची घोषणा! एकूण मतदार किती? बहुमताचा आकडा काय? 15 Points title=
निवडणूक आयोग करणार तारखांची घोषणा

Lok Sabha Election 2024 Date: लोकसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. दुपारी 3 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेबरोबरच 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. या घोषणेनंतर देशभरामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नेमके किती जणं मतदान करणार? बहुमताचा आकडा किती आहे? यासारख्या आकडेवारीसंदर्भात जाणून घेऊयात...

> भारतात होणारी लोकसभेची निवडणूक ही जगातील सर्वाधिक मतदार असलेल्या देशातील निवडणूक ठरणार आहे. 

> केंद्रीय निवडणूक आयोगाने याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार देशातील 96 कोटी 88 लाख लोक मतदान करण्यास पात्र आहे.

> 96 कोटी 88 लाख लोकांपैकी 47 कोटी 10 लाख महिला आहेत.

> मतदानासाठी पात्र असलेल्या भारतीयांमध्ये 49 कोटी 70 लाख पुरुष आहेत.

> देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल 12 लाख मतदानकेंद्र उभारली जाणार असल्याचंही निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

> मतदानासाठी पात्र असलेले 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची संख्या 1 कोटी 84 लाख इतकी असल्याचंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं.

> अगदीच नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या 2 कोटी 63 लाख इतकी आहे.

> मागील म्हणजेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 90 कोटी भारतीय मतदान करण्यासाठी पात्र होते. त्यामध्ये मागील पाच वर्षांमध्ये 6 कोटींहून अधिक मतदारांची भर पडली आहे.

> भारतामध्ये 48 हजार 44 तृतीयपंथी मतदार आहेत. 

> भारतात होणारी यंदाची लोकसभा निवडणूक 7 टप्प्यांमध्ये होईल असे संकेत यापूर्वीच प्रशासकीय यंत्रणांनी दिले आहेत. महिनाभर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदान पार पडेल.

> लोकसभेच्या 543 जागांसाठी मतदान होणार आहे. पूर्वी ही संख्या 545 इतकी होती. मात्र अँगलो इंडियन समाजासाठी राखीव जागांची तरतूद रद्द करण्यात आल्याने खासदारांचा आकडा 543 इतका आहे.

> सत्ता स्थापन करण्यासाठी म्हणजेच बहुमतासाठी या 543 जागांपैकी किमान 50 टक्के जागा जिंकणं बंधनकारक आहे. म्हणजेच 272 जागा जिंकल्यास सत्तास्थापनेचा दावा करता येतो. 

> बहुमत असेल तर सरकारला विधेयकं संमत करणं सहज शक्य होतं. लोकसभेमध्ये अर्ध्याहून अधिक जागा जिंकणारा पक्ष राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेचा दावा करु शकतो.

> ही निवडणूक 1 एप्रिल 2024 ते 31 मे 2024 दरम्यान घेणं आवश्यक आहे.

> भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडीदरम्यान ही निवडणूक लढवली जाणार आहे.