झारखंडमध्ये पाच टप्प्यात निवडणूक होणार

३० नोव्हेंबरला पहिला टप्प्यातलं मतदान

Updated: Nov 1, 2019, 07:14 PM IST
झारखंडमध्ये पाच टप्प्यात निवडणूक होणार title=

नवी दिल्ली : झारखंडमध्ये पाच टप्प्यात निवडणुक होणार आहे. ३० नोव्हेंबरला पहिला टप्प्यातलं मतदान, दुसरा टप्पा ७ डिसेंबरला २० जागांसाठी मतदान होणार, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान १२ डिसेंबरला, चौथ्या टप्प्यासाठी १६ डिसेंबरला मतदान तर शेवटच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान २० डिसेंबरला होणार आहे. २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी पर्यंत असल्याने झारखंड विधानसभेच्या सर्व ८१ जागांसाठी मतदान होणार आहेत. यात १९ पैकी १३ जिल्हे हे सर्वाधिक नक्षल ग्रस्त आहेत. त्या सर्व ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

भाजपचं मिशन-६५ प्लस 

मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या नेतृत्वात भाजप लागोपाठ दुसऱ्यांदा पूर्ण बहुमतासह पुन्हा सत्तेत येण्याची तयारी करते आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत मिळवलेलं यश पाहता विधानसभा निवडणुकीत मिशन-६५ प्लसचं टारगेट ठेवलं आहे. भाजप आणि एजेएसयू एकत्र निवडणूक लढवत आहेत.

मुख्यमंत्री रघुवर दास जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मिर्ती करत आहेत. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन सत्तेत पुन्हा येण्यासाठी बदल यात्रा करत आहेत. 

झारखंडमध्ये एकूण ८१ जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला ३१.३ टक्के मतदानसह ३७ जागा मिळाल्या होत्या. भाजपचा मित्रपक्ष झारखंड स्टूडेंट यूनियन (एजेएसयू) ला ३.७ टक्के मतांसह ५ जागा मिळाल्या होत्या. 

जेएमएमला १९ जागा, काँग्रेसला ७ तर जेवीएमला ८ जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीनंतर जेवीएमच्या ६ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर अपक्षांना ६ जागा मिळाल्या होत्या.