आताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणा

Port Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 13, 2024, 05:53 PM IST
आताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणा title=

Port Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं (Port Blair) नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे. पोर्ट ब्लेअर आात 'श्री विजयपुरम' या नावाने ओळखलं जाणार आहे. देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतिकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव 'श्री विजयपुरम' (Sri Vijay Puram) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अमित शा (Amit Shah) ह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

'श्री विजयपुरम' हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि अंदमान निकोबारचे योगदान दर्शवतं. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि इतिहासात या बेटाला अनन्यसाधारण स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज झालं आहे, असंही अमित शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकावल्यापासून ते वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी सेल्युलर जेलमध्ये केलेल्या भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचं हे बेट साक्षीदार असल्याचा उल्लेख अमित शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

पोर्ट ब्लेअर: भारताचे बेट 

पोर्ट ब्लेअर म्हणजेच 'श्री विजयपुरम' ही अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध इतिहासासाठी  प्रसिद्ध असलेलं शहर. हे शहर भारताच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे 1,200 किलोमीटर अंतरावर आहे.

इतिहासाचा साक्षीदार

पोर्ट ब्लेअरचा इतिहास ब्रिटिश राजवटीशी जोडला गेलेला आहे. ब्रिटिशांनी या बेटाचा वापर तुरुंग म्हणून केला होता. आजही इथं सेल्युलर जेल आहे, ज्याला 'काला पानी' असंही म्हणतात. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांना कैद करण्यासाठी या तुरुंगाचा वापर करण्यात आला होता.

पोर्ट ब्लेअरला निसर्गाचं वरदान

पोर्ट ब्लेअरला निसर्गाचं वरदान लाभलं आहे. इथं समुद्र किनारे, घनदाट जंगल आणि रंगी-बेरंगी मासे पाहायला मिळतात. रादनगर बीच, चिरिया टापू, सेल्यूलर जेल आणि समुद्रिका नेवल मरीन म्यूझियम हे या ठिकाणची प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत.