'प्रेम... जे पाण्या इतकं नितळं...; अजय- अतुल आणि श्रेया घोषाल 'या' मराठी गाण्यासाठी आले एकत्र

Yek Number Movie Jahir Jhala Jagala Song : 'येक नंबर' या चित्रपटातील या रोमॅन्टिक गाण्यामधून मिळणार अजय- अतुल यांच्या संगीताची जादू आणि श्रेया घोषालचा आवाज... 

दिक्षा पाटील | Updated: Sep 22, 2024, 01:13 PM IST
'प्रेम... जे पाण्या इतकं नितळं...; अजय- अतुल आणि श्रेया घोषाल 'या' मराठी गाण्यासाठी आले एकत्र title=
(Photo Credit : PR Handover)

Yek Number Movie Jahir Jhala Jagala Song : झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत, सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. 'ती' करारी नजर, 'तो' कणखर आवाज यांनी चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते. इतक्यात आता या चित्रपटातील पहिलेवहिलं रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे. 'जाहीर झालं जगाला...' असे बोल असणारे हे प्रेमगीत धैर्य घोलप आणि सायली पाटीलवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल जितके भावपूर्ण आहे, तितकेच या गाण्याचे सादरीकरणही अप्रतिम आहे. गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्याला श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी आपल्या गायकीनं चारचांद लावले आहेत. अजय -अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आहे. 

या गाण्याला स्टॅनली डिकोस्टा यांचे नृत्य दिग्दर्शन लाभले आहे. तेजस्विनी पंडित, वरदा साजिद नाडियाडवाला, बवेश जानवलेकर  'येक नंबर' चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची घोषणा, पोस्टर, टिझर पाहाता हा एक ॲक्शनपट असल्याचा अंदाज आतापर्यंत प्रेक्षकांना आला असेलच. परंतु नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यावरून या चित्रपटात प्रेक्षकांना सुंदर प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे. या गाण्यात धैर्य प्रथमच एका वेगळ्या अंदाजात दिसत असून सायली -धैर्यची कमाल केमिस्ट्री यातून पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या स्वप्नातील प्रेमकहाणी असावी, इतक्या सुंदररित्या हे गाणं चित्रित करण्यात आलं असून प्रत्येक प्रेमीयुगुलाला जादुई नगरीची सफर घडवणारे हे गाणे आहे. चित्रपटाची ही दुसरी बाजूही प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

गाण्याबद्दल अजय -अतुल म्हणतात, 'हे एक प्रेमगीत असल्याने या गाण्यातून मनातील प्रेमभावना हळुवार व्यक्त होणे खूप गरजेचे होते. त्यानुसार गुरु ठाकूर यांनी या गाण्याचे बोल रचले आणि संगीतामध्ये आम्हीही थोडं वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तम बोल, तरलता, आवाज, नृत्य दिग्दर्शन लाभल्याने हे गाणे अतिशय उत्कृष्ट बनले आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाच्या भावना व्यक्त करणारे हे गाणे आहे.'

हेही वाचा : पंकज त्रिपाठीच्या लेकीला नेटकऱ्यांनी समजलं श्रद्धा कपूर! VIDEO मुळे एकच चर्चा

या गाण्याबद्दल गीतकार गुरू ठाकूर म्हणतात, ‘मुळात चालीत दडलेला रोमान्स केवळ शब्दरूपाने कागदावर मांडायचे काम मी केले आहे. अतिशय आनंददायी असा अनुभव होता आणि अजय अतुल सोबत काम करताना प्रत्येकवेळी ही टीमवर्कची जादू अनुभवायला मिळते आणि मला खात्री आहे, गाणे ऐकताना रसिकही ती अनुभवतील.’