...म्हणून शबाना आझमींचा संताप अनावर

त्यांनी देशद्रोहाविषयी एक वक्तव्य केलं होतं. 

Updated: Jul 10, 2019, 01:44 PM IST
...म्हणून शबाना आझमींचा संताप अनावर  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी इंदुर येथे आयोजित एका कार्यक्रमात देशद्रोहाविषयी एक वक्तव्य केलं होतं. एक प्रकारे नाव न घेता त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. ज्यानंतर त्यांच्यावर अनेकांनीच तोफ डागल्याचं पाहायला मिळालं. आपल्या एका वक्तव्याला अशा प्रकारे निशाणा केलं जात असल्याचं पाहात आझमी यांनी पुन्हा एकदा ट्विट करत ट्रोलर्सवर उपरोधिक टीका केली आहे. 

ट्विट करत असताना त्यांनी एका जुन्या प्रसंगाचीही जोड दिली. 'माझ्या एका वक्तव्यावर इतकी चर्चा होत आहे... मला हेच कळत नाही की, त्यांच्यासाठी मी इतकी महत्त्वाची आहे का?', असं आझमी यांनी ट्विटमध्ये लिहिलं. दीपा मेहता यांच्या वॉटर या चित्रपटाच्या वेळी टक्कल केल्याबद्दलही आझमी यांच्याविरोधात काही मुस्लिम धर्मीयांनी फतवा काढला होता. पण, तेव्हा मात्र जावेद अख्तर यांनी आपल्याला मौन बाळगण्याचा सल्ला दिला होता, असंही आझमी यांनी ट्विटमध्ये नमूद केलं. 

काय म्हणाल्या होत्या शबाना आझमी ? 

हल्ली सरकारची निंदा केली किंवा सरकारवर टीका केली असता लगेचच तुम्ही देशद्रोही ठरता, असं त्या म्हणाल्या होत्या. यावेळी आझमी यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव न घेता जनतेने ठामपणे त्यांची मतं मांडावीत यासाठी आग्रही सूर आळवला होता. 

भारताची विभागणी करण्यांविषयी बोलणारे देशहितवादी नसल्याचं म्हणत त्यांनी बाबरी मशिद प्रकरणावर प्रकाशझोतही टाकला होता. सर्व स्तरांमध्ये चर्चेत असणाऱ्या बाबरी मशीद मुद्द्यावर आझमी यांनी वक्तव्य करत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा  गवान रामालाही दु:खच झालं असेल जे स्वत: शांततेचे प्रणेते आहेत, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रियांना उधाण आलं होतं.