लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर दिव्या अग्रवालची पहिली पोस्ट, घटस्फोटाच्या चर्चांवर म्हणाली 'प्रत्येक कथेचा शेवट...'

लग्नाच्या तीन महिन्यांनी तिने इन्स्टाग्रामवरुन सर्व फोटो डिलीट केले होते. यामुळे ते दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. 

नम्रता पाटील | Updated: May 28, 2024, 12:48 PM IST
लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर दिव्या अग्रवालची पहिली पोस्ट, घटस्फोटाच्या चर्चांवर म्हणाली 'प्रत्येक कथेचा शेवट...' title=

Divya Agarwal Post On Divorce Rumours : 'बिग बॉस ओटीटी विजेती' आणि अभिनेत्री दिव्या अग्रवाल ही गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या कारणामुळे चर्चेत आहे. दिव्या अग्रवालने तिचा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरसोबत 20 फेब्रुवारी 2024 रोजी लग्नगाठ बांधली. मात्र लग्नाच्या तीन महिन्यांनी तिने इन्स्टाग्रामवरुन सर्व फोटो डिलीट केले होते. यामुळे ते दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर दिव्या अग्रवालने या चर्चांवर मौन सोडलं आहे. 

दिव्या अग्रवाल ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिने इन्स्टाग्रामवर अपूर्वसोबत साखरपुडा, लग्न, हळद यांसह सर्व सभारंभाचे फोटो शेअर केले होते. मात्र अचानक तिने काही दिवसांपूर्वी ते फोटो डिलीट केले. यामुळे लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यातच त्या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोललं जात होतं. आता अखेर दिव्या अग्रवालने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत यावर स्पष्टीकरण दिले आहे.

दिव्या अग्रवालची पोस्ट

"मी काहीही बोलले नाही, कोणतीही पोस्ट किंवा कमेंट केली नाही. मी फक्त 2500 पोस्ट डिलीट केल्या. पण मीडियाने फक्त लग्नाचे फोटो न दिसण्यावरुनच चर्चा केल्या. लोक याकडे कसे पाहतात आणि माझ्याकडून त्यांना काय अपेक्षित आहे हे पाहणं खरोखरंच रंजक असतं. मी नेहमी तेच करत आले आहे, जे लोकांना माझ्याकडून अपेक्षित नाही. आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत – घटस्फोट किंवा बाळ? खरं तर यापैकी काहीही नाही. आता खरं सांगायचं तर मला फक्त माझ्या प्रोफाइलवर पिन केलेल्या पहिल्या पोस्टबद्दल बोलायचं आहे. प्रत्येक कथेचा शेवट हा आनंददायी असतो आणि देवाच्या कृपने माझे पती माझ्या शेजारी शांतपणे झोपले आहेत आणि घोरत आहेत", असे दिव्या अग्रवालने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

Divya Agarwal Post

दरम्यान दिव्या अग्रवाल आणि तिचा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर यांनी 20 फेब्रुवारी 2024 रोजी लग्नगाठ बांधली. दिव्या अग्रवालच्या चेंबूरच्या घरी त्यांचा लग्नसोहळा पार पडला. या दोघांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो पोस्ट केले होते. मात्र हनिमूनवरुन आल्यानंतर अचानक दिव्याने ते सर्व फोटो डिलीट केले. त्या दोघांचा एकमेकांसोबत एकही फोटो सोशल मीडियावर दिसत नव्हता. त्यामुळे लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यातच या दोघांच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चा होऊ लागल्या. पण तसं काहीच नसल्याचं स्पष्टीकरण दिव्या अग्रवालने दिले आहे.