अजिंक्य-हृताचे झाले 'मन बावरे','कन्नी'मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित

 'कन्नी' चित्रपटातील रॅपसाँगनंतर आता या चित्रपटातील सुंदर असे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  या गाण्यात हृता आणि अजिंक्यमधील प्रेम फुलताना दिसत असून दोघांचे गोड रोमँटिक क्षण यात पाहायला मिळत आहेत.  

Updated: Feb 22, 2024, 06:56 PM IST
अजिंक्य-हृताचे झाले 'मन बावरे','कन्नी'मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित  title=

मुंबई : मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन प्रोडक्शन आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या 'कन्नी' चित्रपटातील रॅपसाँगनंतर आता या चित्रपटातील सुंदर असे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'मन बावरे' असे गाण्याचे बोल असून या प्रेमगीताला अभय जोधपूरकर आणि किर्ती किल्लेदार यांचे स्वर लाभले आहेत. तर अमर ढेंबरे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला विशाल शेळके यांनी अप्रतिम संगीत दिले आहे. प्रेमात असणाऱ्या प्रत्येकाच्या भावना दर्शवणारे हे गाणे आहे. या गाण्यात हृता आणि अजिंक्यमधील प्रेम फुलताना दिसत असून दोघांचे गोड रोमँटिक क्षण यात पाहायला मिळत आहेत.  

या चित्रपटात ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांच्यासह शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणाऱ्या 'कन्नी' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन समीर जोशी यांनी केले असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी,चित्रपटाचे निर्माते आहेत. 

दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, "प्रत्येक गाण्यात एक कथा जोडलेली असते आणि काही गोष्टी त्या गाण्यातून व्यक्त होत असतात. तसेच हे गाणेही प्रेमभावना व्यक्त करणारे आहे. त्यामुळे कपल्सना हे गाणे नक्कीच आवडेल. आणि जे नाहीत त्यांना हे गाणे प्रेमात पाडेल. हळुवार, नजरेने खुलत जाणारे प्रेम या गाण्यातून दिसत आहे. या श्रवणीय गाण्याला संगीत टीमही उत्तम लाभली आहे. चित्रपटातील प्रत्येक गाणे हे वेगळ्या धाटणीचे आहे."

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणारा ‘कन्नी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी निर्मित, समीर जोशी दिग्दर्शित ‘कन्नी’ या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा टिझर काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ऋता परदेशात नोकरी करून तिचे आयुष्य सुखकर करायचे आहे. यासाठी तिला तिच्या मित्रांची साथ हवी आहे. परंतु या सगळ्यात तिचे मित्र तिला साथ देणार का तिचे हे स्वप्न अधुरे राहून तिला तिच्या मायदेशी परतावे लागणार, याचे उत्तर प्रेक्षकांना ८ मार्चला मिळणार आहे. टिझरवरून हा चित्रपट मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असल्याचे दिसतेय. यात प्रेम, मैत्री, स्वप्नांचा मागोवा घेणाऱ्या कथेला विनोदाची आणि भावनांचीही जोड आहे.