'जीव घाबरा होतोय...' मणिपूरमधील हिंसाचारावर सोनाली कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया

Sonali Kulkarni Post on Manipur Violence: गेल्या काही दिवसांपासून मणिपूर धगधगतंय आणि तिथे होणाऱ्या हिंसेचा संपुर्ण देशातून निशेष व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे याप्रती अनेक कलाकार आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची पोस्ट ही चर्चेत आली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 26, 2023, 06:33 PM IST
'जीव घाबरा होतोय...' मणिपूरमधील हिंसाचारावर सोनाली कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया title=
July 25, 2023 | actress sonali kulkarni shares an angry post on manipur violence fans reacts

Sonali Kulkarni Post on Manipur Violence: सध्या देशात अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत त्यातून सामजिक स्तरावर वेगळाच संघर्ष पाहायला मिळतो आहे त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे मणिपूर हिसांचाराची आणि सोबतच त्यामुळे स्त्रियांवर झालेला जो अत्याचार आपल्या समोर आला तो पाहता माणुसकी शिल्लक आहे की नाही आणि सोबत स्त्रियांना आता अजून किती या सगळ्यांचा बळी करणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होताना दिसते आहे. तेव्हा यावरून अख्ख्या देशातून चीड व्यक्त केली जाते आहे. मणिपूरमध्ये व्हायरल झालेल्या त्या नग्न स्त्रियांच्या काढलेल्या विकृत आणि अमानुष धिंडीमुळे सर्वत्रच रोष आणि संताप व्यक्त केला जातो आहे. त्यावर आता मराठी तसेच बॉलिवूड कलाकारही स्पष्टपणे बोलताना दिसत आहेत. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यातून पुन्हा एकदा या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित होते आहे. 

काय लिहिलंय सोनालीनं? 

''माझी मुलगी 11 वर्षाची आहे. तिला सध्या सुट्टी आहे. सुट्टीत तिच्यासाठी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आम्ही प्लॅन करत असतो. त्यातली एक गंमत म्हणजे रोज वर्तमानपत्रातल्या 3-4 बातम्या तिने वाचायच्या. कला, क्रीडा, समाज, राजकारण, विज्ञान, विश्व, माणसं... ह्याबाबत कितीतरी गोष्टी तिच्या कानावर पडतात, तिला सांगण्याच्या निमित्ताने आमची माहिती, स्मृती ताजी होते. किती मजेत जाते सकाळ...''

''पण गेल्या आठवड्यापासून माझा थरकाप उडाला आहे.. मी आणि नचिकेत कावेरीपासून पेपर लपवतो आहोत... एका लहान निरागस मुलीला आपल्या देशातली ही बातमी कुठल्या तोंडानं सांगू आम्ही..? की एका मोठ्या जमावाने दोन स्रियांना विवस्त्र करून हुल्लडबाजी करत, त्यांच्या शरीराला निंदनीय स्पर्श करत त्यांची धिंड  काढली. हा विकृत खेळ दिवसाढवळ्या झाला. त्या असहाय्य स्त्रिया बचावासाठी पळत असताना कुठलाही समर्थ जबाबदार पुरूष त्यांना वाचवायला पुढे आला नाही. स्त्रीवर परिस्थितीचा, इतिहासाचा सूड उगवू शकतो हे कोणी ठरवलं. कोणी ठरवलं की स्त्री एक साधन आहे - तिचा आपण हवा तसा उपयोग करू शकतो.. तीव्र संताप येतोय तेचतेच लिहिण्याचा. 10 सेकंद एक व्हिडीओ पाहू शकले मी. त्यात काहींनी त्या बायांना केलेले अक्षम्य क्रूर अश्लील स्पर्श दिसले.  त्यात त्या पुरूषांची जात दिसली - त्या जातीचं नाव होतं नराधम !''

''साधा चुकून पाय लागला कोणाला तर चटकन नमस्कार करतो आपण. परस्त्रीला मातेसमान मानतो आपण. भारतीय संस्कार किती महान असतात म्हणतो आपण. मग..? हे आहेत आपले संस्कार..? अब्रूचे धिंडवडे काढायला शिकवणारे..? बलात्कार झाल्यानंतर हौतात्म्य आणि सहानुभूती देणाऱे..? आपल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहेत, मंगळावर यान पाठवणाऱ्या प्रामुख्यानं महिला शास्त्रज्ञ आहेत - ह्यासाठी अभिमान वाटून घेत असताना हे काय घडून बसलं.. सरकार, पोलीस, पत्रकार, समाजसेवक, न्यायव्यवस्था त्यांचं कर्तव्य करतीलंच. आशा तरी ठेवूया. गरज आहे ही मानसिकता बदलण्याची. हे पुरूष बदलण्याची ! अशा गुन्ह्याला जबरदस्त दहशतीची शिक्षा सुनावण्याची - अशी सजा - जी ऐकून त्या झुंडीच नाही, तर कुणाच्याच पुढच्या सात पिढ्या मनातही पाप करू धजल्या नाही पाहिजेत.''

सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो..

''रडू येऊ नये म्हणून दात घट्ट मिटून ठेवले तरी डोळ्यातून घळघळ पाणी येतंय. जीव घाबरा होतोय.. रस्त्यावरच्या प्रत्येक मुलीबाळीला सुरक्षित घरी पोचवावंसं वाटतंय..  जळी स्थळी काष्ठी पाषाणी, निर्वस्त्र देह कसाबसा हातांनी झाकून - धरणीमाते पोटात घे - असा मूक आक्रोशाचा भाव असलेल्या त्या दोघी मला पळताना दिसत आहेत. कुठलं जनावरही असं पाशवी होताना ऐकलं नाहीए आपण. मी माझ्या मुलीला जगाबद्दल काय चांगलं सांगू.. कोणालाच, कधीच अशा बातम्या वाचायला लागू नयेत..  पुष्यमित्र उपाध्यायांची कविताच अंगी बाणावी लागणार आता प्रत्येकीला……सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो.. अब गोविंद ना आयेंगे..''