चीनी सैनिकांनी विश्वासघात करत भारतीय सैनिकांवर केला हल्ला ?

भारत-चीनी सैन्यात का झाली झडप?

Updated: Jun 17, 2020, 08:51 AM IST
चीनी सैनिकांनी विश्वासघात करत भारतीय सैनिकांवर केला हल्ला ? title=

मुंबई : चीनने पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात केला आहे. पूर्वेकडील लडाखमध्ये माघार घेण्याच्या आश्वासनानंतर चीनने पलटवार करून चर्चेसाठी आलेल्या भारतीय सैनिकांवर हल्ला केला. ज्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. चीनच्या सैन्याने षडयंत्रांतर्गत भारताच्या सैनिकांवर हल्ला केला.

वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता की 15 जून रोजी चीनी सैन्याची जमवाजमव कमी होईल. चीनी सैन्य गलवान प्रदेशातील आपल्या हद्दीत परत येईल. 16 जून रोजी भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी चीनी सैन्य माघार घेईल यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली होती.

परंतु चर्चेत हे ठरल्यानंतर ही चिनी सैन्य मागे गेलं नाही.  तेव्हा 16 बिहार सैन्य दलातील कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याची एक छोटी तुकडी चीनच्या सैनिकांसोबत बोलणी करण्यासाठी गेली. चर्चेदरम्यान चिनी सैन्य माघार घेण्याच्या मन: स्थितीत दिसत नाही. ते मुद्दाम ही गोष्ट टाळत राहिले.

अशी माहिती आहे की, यानंतर चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना वेढले आणि लाठी, दगड आणि काटेरी तारांनी त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरवात केली. या चकमकीदरम्यान एका भारतीय जवानांच्या तुलनेत त्या ठिकाणी 3 चिनी सैनिक होते, परंतु असे असूनही, भारतीय सैनिकांवर अचानक झालेल्या या हल्ल्याचा त्यांनी सामनाच केला नाही तर चीनी सैनिकांना चोख प्रत्युत्तरही दिले.

सुमारे 3 तास दोन्ही बाजूने संघर्ष सुरु होता. ज्यामध्ये कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू यांना गंभीर दुखापत झाली. हा संघर्ष सुरू झाल्यानंतर भारतीय सैनिकांची दुसरी तुकडी घटनास्थळी पोहोचली आणि त्यानंतर चीनच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले गेले. भारतीय जवानांनी दिलेल्या या प्रत्युत्तरात चिनी सैनिकांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याचं कळतं आहे.

वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, या हिंसक चकमकीत 43 चिनी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. पण चीनने याची अधिकृत माहिती दिेलेली नाही. दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पूर्व लडाखच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी सीडीएस बिपिन रावत आणि तिन्ही सैन्य प्रमुखांशी बैठक घेतली. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर देखील उपस्थित होते.

या बैठकीनंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठकही घेण्यात आली, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. लडाखमधील तणावाची परिस्थिती पाहता सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी पठाणकोट दौरा रद्द केला.