World Cup 2023: आज बांगलादेशने भारताचा पराभव केला तर...; कसं असेल सेमी-फायनलचं गणित? जाणून घ्या समीकरण

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतासह न्यूझीलंड संघ दमदार कामगिरी करत आहेत. न्यूझीलंडने आपले चारही सामने जिंकत गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर भारताने तिन्ही सामने जिंकले असून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.   

शिवराज यादव | Updated: Oct 19, 2023, 01:40 PM IST
World Cup 2023: आज बांगलादेशने भारताचा पराभव केला तर...; कसं असेल सेमी-फायनलचं गणित? जाणून घ्या समीकरण title=

एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे, तसतशी रंगत वाढत चालली आहे. आतापर्यंतच्या वर्ल्डकप स्पर्धेत दोन सामन्यांच्या निकालाने क्रिकेटचाहत्यांना धक्का दिला आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने गतविजेता इंग्लंड तर दुसऱ्या सामन्यात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 69 धावांनी तर नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला. श्रीलंका वगळता सर्व संघांनी आपल्या विजयाचं खातं उघडलं आहे. 

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतासह न्यूझीलंड संघ दमदार कामगिरी करत आहेत. न्यूझीलंडने आपले चारही सामने जिंकत गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर भारताने तिन्ही सामने जिंकले असून दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 

भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर 

भारतीय संघ आज आपला चौथा सामना खेळणार आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर भारतीय संघ बांगलादेशशी भिडणार आहे. भारताने हा सामना जिंकला तर न्यूझीलंड संघाला मागे टाकून पहिलं स्थान मिळवतील. यासह सेमी-फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढणार आहे. 

बांगलादेशचा पराभव केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने इतर दोन सामनेही जिंकले तर 6 विजयांसह 12 गुण होतील. यासह भारतीय संघाचा सेमी-फायनलमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित होईल. पण जर सेमी-फायनलमधील स्थान पक्कं करायचं असेल तर भारताला पुढील तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. तेव्हा कोणीही रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाला सेमी-फायनलमध्ये जाण्यापासून रोखू शकणार नाही. 

3 पैकी 4 सामने जिंकल्यास सेमी-फायनलमध्ये प्रवेश

बांगलादेशचा पराभव केल्यानंतर पुढील 3 सामने जिंकल्यास भारताची गुणसंख्या 14 होईल. सध्या भारतीय संघ 3 सामने जिंकत 6 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाला सेमी-फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 6 पैकी किमान 3 ते 4 सामने जिंकावे लागणार आहेत. 

भारताचा चौथा सामना बांगलादेशविरोधात होणार आहे. यानंतर धरमशाला येथे न्यूझीलंड, लखनऊत इंग्लंड, मुंबईत श्रीलंका, कोलकातामध्ये दक्षिण आफ्रिका आणि बंगळुरुत नेदरलँडविरोधात सामना होणार आहे. नेदरलँडने मागील सामन्यात केलेला उलटफेर पाहता भारतीय संघाने कोणालाही हलक्यात घेणं महागात पडू शकतं.