Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 29, 2023, 08:54 AM IST
Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं title=

भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपमधील आपला सहावा सामना इंग्लंडविरोधात खेळणार आहे. भारत-इंग्लंडमधील हा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना सुरु होणार आहे. 

भारत आणि इंग्लंडमध्ये रोमहर्षक सामना होईल असा अंदाज आहे. इंग्लंड संघ गतवर्षीचा वर्ल्डकप विजेता आहे, तर भारताने आतापर्यंत दोन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. पण सध्याच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड  संघ 5 पैकी 4 सामन्यात पराभूत झाला असून, सेमी-फायनलमधून जवळपास बाहेर गेला आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाने सलग पाचही सामने जिंकले आहेत. 

आकडेवारीत इंग्लंडचं पारडं जड

इंग्लंड संघ लयीत नसला तरी त्याला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. इंग्लंड संघासमोर करो या मरो स्थिती असल्याने ते आक्रमकपणे खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना भारत किंवा इंग्लंडच्या असा एकतर्फी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, इतिहास पाहिला तर वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचं पार जड दिसत आहे. दोन्ही संघ आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये 8 वेळा आमने-सामने आले आहेत. यामधील भारताने 3 आणि इंग्लंडने 4 सामन जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला होता. वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरोधात भारताने 2003 मध्ये शेवटचा विजय मिळवला होता. 

भारतासमोर 2 आव्हानं

भारतीय संघासमोर यावेळी 2 मोठी आव्हानं दिसत आहेत. भारतीय संघाचा समतोल राखणं हे पहिलं आव्हान असेल. हार्दिक पांड्याच्या जागी संधी मिळालेल्या मोहम्मद शामीलाच कायम ठेवावं की, लखनऊमधील स्थिती पाहता आर अश्विनला संधी द्यावी ही मोठी डोकेदुखी ठरु शकते.  मोहम्मद शामीने न्यूझीलंडविरोधात 5 विकेट्स घेतले होते. दरम्यान मागील सामन्यात अपयशी ठरलेल्या सूर्यकुमार यादवला पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

भारताने या वर्ल्डकपमध्ये पाचही सामन्यात धावांचा पाठलाग करत विजय मिळवला आहे. त्यामुळे जर येथे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली तर आव्हानात्मक ठरु शकतं. इंग्लंडचे जलदगती गोलंदाज मार्क वूड आणि क्रिस वोक्स धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे भारतीय फलंदाजांना बचावात्मक खेळावं लागेल. 

डेंग्यूमुळे पहिल्या दोन सामन्यातून बाहेर राहिलेल्या शुभमन गिलला मोठी खेळण्याची प्रतिक्षा आहे. तर विराट कोहलीचा शतक ठोकत सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याचा प्रयत्न असेल. कुलदीप यादवच्या गोलंदाजीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे. इंग्लंडचे फलंदाज चांगले आहेत, पण ते मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. 

इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), जो रूट, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), हॅरी ब्रुक, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, क्रिस वोक्स, सॅम करन, डेव्हिड विली, आदिल राशिद, मार्क वूड, ब्रायडन कार्स, गस एटकिंसन.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.