मागच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरणार

भारत आणि श्रीलंकेमधली दुसरी वनडे मॅच बुधवारी मोहालीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 12, 2017, 08:52 PM IST
मागच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरणार  title=

मोहाली : भारत आणि श्रीलंकेमधली दुसरी वनडे मॅच बुधवारी मोहालीमध्ये खेळवण्यात येणार आहे. धर्मशालामध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेनं भारताचा दारुण पराभव केला होता. या मॅचमध्ये एकावेळी तर भारताची अवस्था ७ आऊट २९ रन्स होती. पण धोनीच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला ११२ रन्सपर्यंत मजल मारता आली.

पहिल्या वनडेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ मोहालीच्या मैदानात उतरेल. श्रीलंकेविरुद्ध भारताची ३ वनडेची सीरिज आहे. त्यामुळे ही मॅचही गमावली तर सीरिज गमावण्याची नामुष्की भारतावर येईल.

मोहालीची ही विकेट धर्मशालामधल्या विकेटप्रमाणेच फास्ट बॉलरला मदत करेल, असं बोललं जातंय. बुधवारी सकाळी ११.३० वाजता या मॅचला सुरुवात होणार आहे.

'आता चांगलं प्रदर्शन करू'

विराट कोहलीच्या अनुपस्थित हा चांगला अनुभव नव्हता. आम्हाला कुठल्याच मॅचमध्ये पराभूत व्हायचं नाहीये. आता आगामी दोन मॅचेसमध्ये आम्हाला आमचं चांगलं प्रदर्शन दाखवायचं आहे असं वक्तव्य कॅप्टन रोहित शर्मानं दिलं आहे.