'माझी भारतीयांना विनंती आहे की आता तरी...', शोएब अख्तरने मोहम्मद शमीचा उल्लेख करत केलं मोठं विधान

भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर प्रभावित झाला आहे. त्याने यानिमित्ताने भारतीयांना एक विनंती केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 4, 2023, 12:48 PM IST
'माझी भारतीयांना विनंती आहे की आता तरी...', शोएब अख्तरने मोहम्मद शमीचा उल्लेख करत केलं मोठं विधान title=

गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे भारतीय संघाने श्रीलेकंला अवघ्या 55 धावांमध्ये गारद केलं. गोलंदाजांच्या जोरावर भारताने श्रीलंकेला तब्बल 302 धावांनी पराभूत करत वर्ल्डकपमधील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने या तिघांनीच एकूण 9 विकेट घेत 20 ओव्हर्समध्येच सामना संपवला. भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीवरीने शोएब अख्तर प्रचंड प्रभावित झाला असून त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. 

"भारतीय संघ आता अत्यंत धोकादायक झाला आहे. त्यांना रोखणं आता कठीण आहे. माझी भारतीयांना विनंती आहे की त्यांनी आता त्यांच्या गोलंदाजांनाही सेलिब्रेट करणं सुरु केलं पाहिजे. वानखेडे मैदानात प्रत्येक चेंडूवर प्रेक्षक आवाज करत होते आणि आनंद व्यक्त करत होते. मी स्वत: मोहम्मद शमीसाठी आनंदी आहे. त्याला सूर गवसला असून, त्याने मोहम्मद सिराजला मागे टाकलं आहे. बुमराहदेखील धोकादायक गोलंदाज असून तो इतर दोघांना मोकळेपणाने गोलंदाजी करण्याची संधी देत आहे," असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.

मोहम्मद शमीने श्रीलंकेविरोधात 5 विकेट्स घेतले. शमीने यासह भारताचे दिग्गज झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनी मागे टाकत वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. 

मोहम्मद शमीने वर्ल्डकपमध्ये 14 सामन्यात 45 विकेट्स घेतले आहेत. 18 धावांवर 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमी सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राथने 39 सामन्यात 71 विकेट्स घेतल्या आहेत. 

क्रिकेट विश्वचषकात तीनवेळा पाच विकेट्स घेणारा शमी एकमेव भारतीय गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद शमीव्यतिरिक्त केवळ ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने या स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. याशिवाय शमीने माजी फिरकीपटू हरभजन सिंगलाही मागे टाकले आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिकवेळा पाच बळी घेतले. मोहम्मद शमीने तीनवेळा ही कामगिरी केली असून, हरभजनने तीनवेळा ही कामगिरी केली होती.