रोहितच टॉसचा बॉस; तरीही फॅन्सना का आठवतोय कोहली?

पुन्हा एकदा सोशल मीडियावर मीम्सचा महापूर सुरू झाला.

Updated: Nov 22, 2021, 11:17 AM IST
रोहितच टॉसचा बॉस; तरीही फॅन्सना का आठवतोय कोहली? title=

मुंबई : टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका जिंकली आहे. रविवारी कोलकातामध्ये झालेल्या मालिकेतील शेवटच्या टी-20 सामन्यातही रोहित शर्माने टॉस जिंकला. रोहित शर्माने टॉस जिंकण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर मीम्सचा महापूर सुरू झाला.

रोहित शर्मा पूर्णवेळ T-20 कर्णधार झाल्यानंतर ही पहिलीच मालिका आहे. रोहितने जयपूर, रांची आणि आता कोलकातामध्ये न्यूझीलंडविरुद्ध टॉस जिंकला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्माने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर कोलकातामध्ये त्याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

तर दुसरीकडे टी-20 वर्ल्डकपच्या वेळी विराट कोहलीच्या नशीबाने त्याला अजिबात साथ दिली नाही. विराट कोहलीने पहिल्या तीन सामन्यात टॉस गमावला होता. शेवटच्या दोन सामन्यात फक्त विराटला टॉस जिंकता आला होता.

वर्ल्डकपमध्ये टॉसने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. केवळ टी-20 वर्ल्डकपमध्येच नाही तर कर्णधार म्हणून टॉसच्या बाबतीत विराट कोहलीचा विक्रम वाईट आहे.

रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला होता. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आणि म्हटलं की, रोहित शर्माचा कर्णधार होताच टीम इंडियाचे नशीब उजळलं. तर काहींनी असेच नशीब पुढच्या वर्षीच्या वर्ल्डकपमध्येही असलं पाहिजे असं म्हटलंय.