लोकांशी भेटणंही कमी केलंय...; वर्ल्डकपसाठी सिलेक्शन न झाल्याने 'हा' खेळाडू अस्वस्थ?

बऱ्याच दिवसांपासून या खेळाडूला टीम इंडियात संधी मिळालेली नाही. 

Updated: Oct 9, 2022, 01:03 PM IST
लोकांशी भेटणंही कमी केलंय...; वर्ल्डकपसाठी सिलेक्शन न झाल्याने 'हा' खेळाडू अस्वस्थ? title=

मुंबई : युवा फलंदाज पृथ्वी शॉला बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही. अलीकडे, पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि दुलीप ट्रॉफीमध्येही दोन शतकं झळकावली आहेत. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा पृथ्वी शॉला संधी देण्यात आली नाही. दरम्यान पृथ्वीने टीममध्ये निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीये.

पृथ्वी शॉ म्हणाला की, तो खूप निराश झाला आहे, मी खूप मेहनत करतोय आणि रन्सही करतोय पण मला संधी मिळत नाहीये. पण यात काही अडचण नाही, कारण जेव्हा राष्ट्रीय निवडकर्त्यांना वाटेल की मी तयार आहे, तेव्हा ते मला नक्कीच बोलावतील. जिथे जिथे संधी मिळते तिथे मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो.

माझं वजन खूप कमी झालं- पृथ्वी शॉ

एका वेबसाईटशी संवाद साधताना पृथ्वी शॉ म्हणाला की, "मी फलंदाजीत फारसा बदल केलेला नाही, पण फिटनेसच्या बाबतीत मी खूप मेहनत घेतलीये आहे. माझं वजन कमी झालंय, आयपीएलपासून माझे 8 किलो वजन कमी झालंय. आता मी जिममध्ये बराच वेळ घालवतोय. कोल्ड ड्रिंक्स आणि मिठाई बंद केली आहे आणि चायनीज फूड देखील खात नाहीये."

मी आता जास्तीत जास्त वेळ स्वतःसोबत घालवतो, मी माझ्या खोलीत राहतो आणि लोकांना भेटणं कमी केलंय. मी आरशासमोर स्वतःशी बोलतो, मला हे करायला कोणी सांगितलं नाहीये. मी हे चांगलं बनवण्यासाठी मी हे करतोय.

पृथ्वी शॉ भारतासाठी शेवटचा टेस्ट सामना 2020 मध्ये खेळला होतोय. तर एकदिवसीय सामन्यात तो शेवटचा 2021 मध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसला होता. यावर्षी पृथ्वी शॉने रणजी करंडक, दुलीप ट्रॉफी आणि इंडिया-अ साठी चांगली कामगिरी केलीये. मात्र, त्याला टीम इंडियात संधी मिळालेली नाही.