PAK vs IND : विराटनं धुतलं, कुलदीपने लोळवलं... पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा 228 धावांनी ऐतिहासिक विजय!

Team india historical win : भारतीय संघाने पाकिस्तानवर 228 धावांनी विराट विजय मिळवला आहे. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे.

सौरभ तळेकर | Updated: Sep 12, 2023, 07:28 AM IST
PAK vs IND : विराटनं धुतलं, कुलदीपने लोळवलं... पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा 228 धावांनी ऐतिहासिक विजय! title=
Team india historical win PAK vs IND

Pakistan vs India Asia Cup 2023 : गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील लांबलचक सामना अखेर भारताने जिंकला आहे. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये टीम इंडियाने इतिहास रचला. दोन्ही संघाच्या इतिहासातील (Team india historical win) भारताचा हा सर्वांत मोठा विजय ठरलाय. टीम इंडियाने 228 धावांनी यजमान पाकिस्तानचा धुव्वा उडवला. केएल राहुलची (KL Rahul) धमाकेदार कमबॅक शतक अन् किंग कोहलीच्या (Virat Kohli) विराट खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. तर कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) पंचसमोर ना बाबर टिकला ना रिझवान...

सततच्या पावसामुळे सामना खोळंबला गेला. काल पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, काल फक्त 24.1 ओव्हरचा सामना झाला. त्यानंतर रिझर्व्ह डे असल्याने आज सामना पुन्हा तीन वाजता सुरू झाला. 24.2 ओव्हरपासून सुरू झालेला सामना पावसाच्या लपाछपीमुळे रेंगाळत गेला. मात्र, टीम इंडियाने पुर्ण 50 ओव्हर फलंदाजी केली. सलामीवीर रोहित अन् शुभमन यांनी पाया रचल्यानंतर कोहली आणि केएलने विराट धावसंख्या उभी केली. टीम इंडियाने 356 धावा स्कोरबोर्डवर उभ्या केल्या.

भारताने दिलेल्या 357 धावांचं आव्हान पार करताना पाकिस्तानी फलंदाजांची भंबेरी उडली. इमाम-उल-हक आणि बाबर आझम झटपट बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवान देखील लगेच ठेपाळला. त्यानंतर आगा सलमान आणि इफ्तिखार अहमद यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा, पण कुलदीपच्या फिरकीपुढं काहीही चाललं नाही. कुलदीप यादवने मिडल ऑर्डर फोडून काढली अन् पाकिस्तानचा संघ 32 ओव्हरमध्ये फक्त 128 धावा करू शकला. अशातच टीम इंडियाने पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव केलाय.

केएल राहुल आणि विराट कोहली दोघांनी वैयक्तिक शतक ठोकलं. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 233 धावांची नाबाद भागीदारी केली. विराट कोहली याने 94 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 122 धावा केल्या. तर केएल राहुल याने 106 बॉलमध्ये 12 फोर आणि 2 कडक सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 111 रन्स केल्या. त्यामुळे भारताला ऐतिहासिक 356 धावांचा आकडा गाठता आला आहे. 2008 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला 140 धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर आता टीम इंडियाने मोठा विजय मिळवलाय.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ.