देशासाठी काहीपण..! बीसीसीआयने दाखवली मनाची श्रीमंती, जय शहांनी जाहीर केली 8.5 कोटींची मदत

Jay shah On Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक्ससाठी बीसीसीआय (BCCI financial assistance) आर्थिक मदत जाहीर केली आहे. जय शहा यांनी ट्विट करत याची घोषणा केली.

सौरभ तळेकर | Updated: Jul 21, 2024, 08:26 PM IST
देशासाठी काहीपण..! बीसीसीआयने दाखवली मनाची श्रीमंती, जय शहांनी जाहीर केली 8.5 कोटींची मदत title=
Jay shah, Bcci, paris olympics 2024

BCCI financial assistance for Paris Olympic : भारतात क्रिकेटला मोठं महत्त्व आहे. भारतात क्रिकेटला खेळ म्हणून नाही तर धर्म म्हणून पाहिलं जातं. जन्मानंतर लहान मुल पहिला खेळ खेळत असेल तो म्हणजे क्रिकेट... क्रिकेटमध्ये मोठी प्रगती झाली. व्यावसायिक क्रिकेटचा उदय झाला अन् क्रिकेटला भरभराट आली. पण इतर खेळांबद्दल अशी गोष्ट पहायला मिळाली नाही. इतर खेळांमध्ये ना कधी व्यावसायिक प्रगती दिसून आली ना सरकारने कधी मोठ्या पातळीवर मदतीचा हात पुढे केला. तरी देखील काही लहानमोठ्या आर्थिक बळावर अनेक खेळ मोठे झाले अन् देशातील कानाकोपऱ्यातून खेळाडू पुढे येऊ लागले. खेळाडू ऑलिम्पिक्समध्ये झळकले पण त्यांना आर्थिक पाठबळ मिळालं नाही. अशातच आता पॅरिस ऑलिम्पिक्ससाठी बीसीसीआय म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठं पाऊल उचललं आहे.

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी घेतलेल्या निर्णयाचं कौतूक होताना दिसत आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या अतुलनीय खेळाडूंना बीसीसीआय पाठिंबा देईल हे जाहीर करताना मला अभिमान वाटतो, असं जय शहा यांनी म्हटलं आहे. आम्ही ऑलिम्पिक मोहिमेसाठी IOA ला 8.5 कोटी रुपये देत आहोत, अशी घोषणा बीसीसीआय सचिव जय शहा यांनी केली. त्यामुळे आता बीसीसीआयचं कौतूक होताना दिसत आहे. यालाच मनाची श्रीमंती म्हणतात का? असंही सोशल मीडियावर म्हटलं जातंय. 

बीसीसीआयने मोठा भाऊ म्हणून ऑलिम्पिक मोहिमेसाठी खेळाडूंना आर्थिक पाठबळ दिलंय. त्यामुळे आता खेळाडू देखील भारताला पदक मिळवून देण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, एवढं नक्की..  पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या खेळांसाठी भारतीय खेळाडूंनी जोरदार तयारी केलीये. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताने एकूण 7 पदकं जिंकली होती. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये खेळाडू इतिहास गाजवतील, यावर प्रत्येक भारतीयांना विश्वास आहे.

दरम्यान, 45 खेळांमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतानं पॅरिस ऑलिम्पिकसाठी 117 खेळाडू तयार केले आहेत. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारतीय खेळाडू डझनभर पदकं घेऊन येतील, असा विश्वास आहे. ऑलिम्पिकसाठी 90 लाख तिकीटं विकली गेली आहे. यामध्ये 206 देशांचे 10,500 खेळाडू सामील होतील.