Ishan Kishan च्या 'त्या' एका कॅचने पलटली संपूर्ण मॅच, फोटो व्हायरल

खेळाच्या 18व्या ओव्हरमध्ये कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूरकडे सोपवली.

Updated: Feb 21, 2022, 09:01 PM IST
Ishan Kishan च्या 'त्या' एका कॅचने पलटली संपूर्ण मॅच, फोटो व्हायरल title=

मुंबई : क्रिकेट विश्वातील असे काही क्षण असतात, ज्याची बऱ्याचदा चर्चा होते. लोकांना हे क्षण सारखे सारखे पाहावेसे वाटतात. अशीच एक घटना रविवारी खेळल्या गेलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान घडली. या घटनेनं सगळ्यांना वेड लावलं आहे. ज्यानंतर या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर भलतेच चर्चात आले आहेत.

हे फोटो आहे इशान किशनच्या एका कॅचचे आहेत, ज्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या सामन्याच्या वेळी निकोलस पूरन टीम इंडियाकडून विजय हिसकावण्याचा प्रयत्न करत होता, पण इशान किशनने लांब डाईव्ह घेत निकोलस पूरनची कॅच घेतली आणि ज्यामुळे टीम इंडियाला सामन्यात परत येता आले आहे. भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला.

खेळाच्या 18व्या ओव्हरमध्ये कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूरकडे सोपवली. शार्दुल ठाकूरच्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर निकोलस पूरनने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चूक केली, चेंडू हवेत खूप उंच गेला आणि विकेट्सच्या मागे उभ्या असलेल्या इशान किशनने चेंडूच्या दिशेने धाव घेतली आणि शेवटी डायव्ह मारताना शानदार कॅच घेतली.

जेव्हा जेव्हा टीम इंडिया अडचणीत आली आहे तेव्हा शार्दुल ठाकूरला चेंडू दिला गेला आहे आणि शार्दुलनेही आपली जबाबदारी चांगलीच पार पाडली आहे.

निकोलन पूरन बाद झाला तेव्हा 17.1 ओव्हरनंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या 147 धावा होती, म्हणजे वेस्ट इंडिजला विजयासाठी अवघ्या 17 चेंडूत 38 धावांची गरज होती. निकोलस ज्या फॉर्ममध्ये होता, ते पाहता त्याने सामना आपल्या नावे केला असता यात काही शंका नाही.

इशान किशनसाठी तिसरा टी20 खूप आत्मविश्वास देणारा ठरला आहे. दोन सामन्यांत धावा काढू न शकलेल्या किशनने या सामन्यातही फलंदाजीचे योगदान दिले आणि निकोलस पूरनच्या या अवघड कॅचवर शानदार डाईव्ह मारत टीमला पुन्हा मॅचमध्ये आणले.

निकोलस पूरनने या सामन्यात 47 चेंडूत 61 धावा केल्या, या खेळीत त्याने 8 चौकार आणि 1 सिक्स लगावला. आऊट झाल्यानंतर निकोलस पूरनने कॅमेऱ्यासमोर आपला राग व्यक्त केला, जो पाहून सगळेच थक्क झाले.

भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर भारतीय संघाने 184 धावा केल्या. भारतीय संघाच्या लक्षाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघ केवळ 167 धावा करू शकला आणि सामना 17 धावांनी गमावला, त्यानंतर भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 ने जिंकली.