भारताचे 'दादा' खेळाडू उघडे पडले, गावसकर यांची टीका

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताच्या काही खेळाडूंवर टीका केली आहे.

Updated: May 17, 2018, 05:24 PM IST
भारताचे 'दादा' खेळाडू उघडे पडले, गावसकर यांची टीका  title=

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताच्या काही खेळाडूंवर टीका केली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू आयपीएलमधल्या उसळणाऱ्या खेळपट्ट्यांमुळे उघडे पडले आहेत, असं गावसकर म्हणाले आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या स्तंभामध्ये गावसकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यंदाच्या आयपीएलमधल्या खेळपट्ट्या सर्वोत्तम आहेत. यासाठी बीसीसीआयची प्रशंसा करायला पाहिजे, असं गावसकर म्हणाले. या वर्षाच्या खेळपट्ट्यांवर बॉल पहिल्या बॉलपासून वळला नाही. तसंच बॉलही बॅटवर व्यवस्थित येत आहे आणि बॅट्समनना शॉट खेळायला मदत होत आहे, असं गावसकर यांनी या स्तंभात लिहीलं आहे.

आयपीएलमधल्या या खेळपट्ट्यांमुळे भारताचं भवितव्य असणारे काही खेळाडू संघर्ष करताना दिसत आहेत. रणजी ट्रॉफीमधल्या दादा बॅट्समननाही या खेळपट्ट्यांमुळे उसळी मारणारा चेंडू खेळताना धडकी भरत असल्याची टीका गावसकर यांनी केली आहे. भारताचं भवितव्य असणाऱ्या या खेळाडूंना या वर्षाच्या शेवटी असणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही संघर्ष करावा लागू शकतो. कारण ऑस्ट्रेलियामध्ये यापेक्षा जास्त उसळी असणाऱ्या खेळपट्ट्या असतील, असं वक्तव्य गावसकर यांनी केलं आहे.