श्रीलंका व्हाईट वॉश, तिसऱ्या टी-20मध्येही भारताचा विजय

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्येही भारताचा ५ विकेट्सनी विजय झाला आहे. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 24, 2017, 10:29 PM IST
श्रीलंका व्हाईट वॉश, तिसऱ्या टी-20मध्येही भारताचा विजय  title=

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्येही भारताचा ५ विकेट्सनी विजय झाला आहे. याचबरोबर भारतानं ३ टी-20 मॅचची ही सीरिज ३-०नं जिंकून लंकेला व्हाईट वॉश केलं आहे. श्रीलंकेनं ठेवलेल्या १३६ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं १९.२ ओव्हरमध्ये १३९ रन्स केल्या.

भारताकडून मनिष पांडेनं २९ बॉल्समध्ये सर्वाधिक ३२ रन्स केल्या. तर श्रेयस अय्यरनं ३२ बॉल्समध्ये ३० रन्स केल्या. कॅप्टन रोहित शर्मानं २० बॉल्समध्ये २७ रन्स केल्या. दिनेश कार्तिकनं १२ बॉल्समध्ये नाबाद १८ रन्स आणि धोनीनं १० बॉल्समध्ये नाबाद १६ रन्स करून भारताला विजय मिळवून दिला.

या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. कॅप्टन रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय बॉलर्सनी योग्य ठरवला आणि श्रीलंकेला ठराविक कालावधीनंतर झटके दिले. या मॅचमध्ये युझवेंद्र चहलच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराहऐवजी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली होती.

वॉशिंग्टन सुंदरनं ४ ओव्हरमध्ये २२ रन्स देऊन १ विकेट घेतली. तर मोहम्मद सिराजला ४ ओव्हरमध्ये ४५ रन्स देऊन १ विकेट मिळवण्यात यश आलं. जयदेव उनाडकटला २ आणि हार्दिक पांड्याला २ विकेट मिळाल्या तर कुलदीप यादवला १ विकेट मिळाली.