T-20 World Cup: विराट कोहलीच्या एका ट्विटवर भिडले भारत-पाक फॅन्स!

हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी विराट कोहलीचं एक ट्विट समोर आलं आहे 

Updated: Oct 22, 2021, 11:09 AM IST
T-20 World Cup: विराट कोहलीच्या एका ट्विटवर भिडले भारत-पाक फॅन्स! title=

मुंबई : रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान वर्ल्डकप टी -20 सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. क्रिकेट चाहते, तज्ज्ञ आणि विश्लेषक या सामन्याबद्दल विविध विश्लेषण करत आहेत. अनेक राजकारणी आणि माजी क्रिकेटपटूंनीही या सामन्याबद्दल बरीच वक्तव्ये केली आहेत. दरम्यान या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी विराट कोहलीचं एक ट्विट समोर आलं आहे आणि त्यानंतर सर्व भारतीय आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वास्तविक विराट कोहलीने आपल्या ब्रँड व्रोगनच्या प्रमोशनसाठी एक ट्विट केलं. त्याने लिहिलंय, की लोक विचारत आहेत, रविवारी एक मोठा सामना आहे. तू चिंताग्रस्त आहेस का? माझं उत्तर- व्रोगन म्हणजे चूक.

कोहलीच्या या ट्विटमुळे केवळ पाकिस्तानी चाहत्यांनीच त्याला ट्रोल केलं नाही, तर काही भारतीय चाहत्यांनी त्याला सामन्यापूर्वी सराव करण्याचा सल्लाही दिला. एका व्यक्तीने लिहिलं की, पाकिस्तानसोबतच्या मोठ्या सामन्यासाठी सराव करण्याऐवजी कोहली जाहिरातींमध्ये वेळ घालवत आहे. त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने सांगितलं की सर, तुझं मार्केटिंग वर्ल्ड कप चालू आहे. 

पाकिस्तानमधील एका चाहत्याने लिहिलं की, जेव्हा शाहीन आफ्रिदी तुमची विकेट घेईल, तेव्हा तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. त्याचवेळी, एका भारतीय चाहत्याने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपल्याला तूर्तास लो-प्रोफाइल राहण्याची गरज आहे. आपण आधी त्यांचा पराभव केला पाहिजे आणि नंतर आनंद साजरा केला पाहिजे. प्रत्येक मोठ्या स्पर्धेत पाकिस्तानला हरवण्याचा आपला विक्रम कायम ठेवावा लागेल.

एका पाकिस्तानी चाहत्याने लिहिलं की, भारत-पाकिस्तान सामन्याबद्दलचं तुमचं ट्विट हे सिद्ध करतं की या सामन्याचा दबाव तुमच्या मनात वाढला आहे. पाकिस्तानचा एकही खेळाडू या सामन्याबद्दल जास्त बोलत नाही किंवा ट्वीट करत नाही. कारण ते सामान्य सामन्याप्रमाणे घेत आहेत आणि ते या सामन्याबद्दल निश्चिंत आहेत.

याला उत्तर देताना एका भारतीय चाहत्याने सांगितलं की मला आशा आहे की, तुम्हाला माहित असेल की विराट कोहली सोशल मीडियावर स्वतःचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत नाही. त्याची स्वतःची पीआर टीम आहे जी सोशल मीडियावर प्रेक्षकांना जोडते आणि स्वतः कोहलीने कधीही पाकिस्तान संघ किंवा त्यांच्या खेळाडूंबद्दल वाईट बोललेलं नाही.