U-19 World Cup: फायनलमध्ये विचित्र रन आऊट, थर्ड अंपायरही वैतागला

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा फक्त १७८ रनवर ऑल आऊट झाला.

Updated: Feb 9, 2020, 07:35 PM IST
U-19 World Cup: फायनलमध्ये विचित्र रन आऊट, थर्ड अंपायरही वैतागला title=
फोटो सौजन्य : क्रिकेट वर्ल्ड कप

मुंबई : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा फक्त १७८ रनवर ऑल आऊट झाला. बांगलादेशविरुद्धच्या या मॅचमध्ये भारताची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे गडगडली. पाकिस्तानविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८८ रनची खेळी केली. जयस्वाल आऊट झाल्यानंतर मॅचमध्ये विचित्र रन आऊट पाहायला मिळाला. दोन्ही बॅट्समन एकाच क्रीजमध्ये पोहोचल्यामुळे थर्ड अंपायरला आऊट द्यायला अडचण आली.

४३व्या ओव्हरमध्ये ध्रुव जुरैल आणि अथर्व अंकोलेकर मैदानात असताना हा प्रकार घडला. रकीब उल हसनच्या बॉलिंगवर ध्रुवने बॉल ऑफ साईडला मारला आणि रन काढण्यासाठी तो धावला. यावेळी ध्रुव आणि अथर्व यांच्यात गोंधळ झाला. ध्रुव रन काढण्यासाठी पळाला तेव्हा अथर्व पुन्हा क्रीजमध्ये परत आला. बांगलादेशच्या खेळाडूने तोपर्यंत बॉल विकेट कीपरकडे दिला होता.

दोन्ही खेळाडू एकाच क्रीजमध्ये असल्यामुळे थर्ड अंपायरला निर्णय द्यायला बराच वेळ लागला. अखेर अथर्व क्रीजमध्ये आधी पोहोचल्यामुळे ध्रुवला रन आऊट देण्यात आलं. ध्रुव माघारी परतल्यानंतर भारतीय बॅट्समन पटापट आऊट झाले. १५६/४ अशी अवस्था असताना भारताची बॅटिंग गडगडली आणि पुढच्या २१ रनवर संपूर्ण टीम पॅव्हेलियनमध्ये परतली.