'ही' टीम वर्ल्ड कप जिंकेल, गावसकर यांची भविष्यवाणी

५० ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे.

Updated: Mar 13, 2019, 03:49 PM IST
'ही' टीम वर्ल्ड कप जिंकेल, गावसकर यांची भविष्यवाणी title=

नवी दिल्ली : ५० ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी प्रत्येक टीमने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी या वर्ल्ड कपबद्दल भविष्यवाणी केली आहे. हा वर्ल्ड कप जिंकण्याची सर्वोत्तम संधी इंग्लंडला असल्याचं गावसकर म्हणाले.

मागच्या दोन वर्ल्ड कपचा इतिहास बघितला तर घरच्या मैदानात खेळणारी टीम वर्ल्ड कप जिंकत आहे. २०११ साली भारतानं आणि २०१५ साली ऑस्ट्रेलियानं त्यांच्या मायदेशात वर्ल्ड कप जिंकला होता. यामुळे इंग्लंड यावेळी वर्ल्ड कप जिंकण्याचा दावेदार आहे, असं गावसकर म्हणाले. गावसकर दिल्लीमध्ये ब्रिटीश उच्चायुक्तांच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं.

याआधीही गावसकर यांनी इंग्लंड आणि भारत हे वर्ल्ड कप जिंकण्याचे प्रबळ दावेदार असल्याचं म्हणाले होते.

'या आधी २०१५ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा साखळी सामन्यातच बांगलादेश कडून पराभव झाला होता. या पराभवामुळे इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. या पराभवातून इंग्लंडने धडा घेत संघाच्या कामगिरीत बदल केला आहे. त्यामुळे त्यांच्यातील विश्वासाची भावना वाढीस लागली आहे. हा विश्वास कौतुकास्पद आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ बळकट झाला आहे', अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली होती.

'इंग्लंडची टीम परिपूर्ण आहे. त्यांच्याकडे सलामीवीरांची चांगली जोडी आहे. तसेच त्यांच्यातील मधल्या फळीतील फलंदाज देखील तगडे आहेत. इंग्लंडकडे ऑलराऊंडरचीही कमी नाही. जेव्हा आपण आपल्या देशात खेळतो, तेव्हा आपल्या पाठीशी आपल्या देशातील लोकांचा आधार असतो. तसेच परिस्थिती देखील अनुकूल असते. इंग्लंडकडे जॉस बटलर आणि जॉनी बेरेस्टो सारखे दोन चांगले कीपर देखील आहेत. त्यामुळे एकूणच इंग्लंडची टीम ही इतरांच्या तुलनेत वजनदार ठरत आहे', असं मत गावसकर यांनी मांडलं होतं.

'भारतीय टीम सलगपणे इंग्लंडमध्ये दोन वर्ष खेळली आहे. त्यामुळे या अनुभवाचा फायदा भारतीय खेळाडूं होऊ शकतो. भारतीय टीम २०१७ आणि २०१८ ला इंग्लंडमध्ये खेळले आहेत. भारताकडून वर्ल्ड कपसाठी ज्या खेळाडूंची निवड होईल त्या खेळाडूंना इंग्लंड मधील परिस्थिती माहिती आहे.. त्यांना तिथे खेळण्याचा अनुभव आहे. वर्ल्ड कपचं जेतेपद मिळवण्यासाठी भारतीय टीमला या अनुभवाचा फायदा होऊ शकतो', असं गावसकर यांना वाटतं.