ICC T20 WCची सेमीफायनल गाठण्यासाठी भारतीय संघाच्या मार्गात अडचणी?

पाकिस्तानविरूद्धच्या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.

Updated: Oct 25, 2021, 02:20 PM IST
ICC T20 WCची सेमीफायनल गाठण्यासाठी भारतीय संघाच्या मार्गात अडचणी? title=

दुबई : टी -20 वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा संपूर्ण खेळ खराब झाला आहे. या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. हे आव्हान टीम इंडियासाठी अवघड नसेल. पण मोठ्या स्पर्धांमध्ये कधी कधी कमकुवत संघही चुकतात. मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला काय करावे लागेल यावर एक नजर टाकूया.

टीम इंडिया या स्पर्धेतील ग्रुप 2 मध्ये आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तान, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि नामिबियाचे संघ आहेत. या 6 संघांपैकी फक्त 2 अव्वल संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. म्हणजेच उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघाला किमान 4-5 सामने जिंकावे लागतील. याशिवाय हे प्रकरण नेट रनरेटवरही अडकू शकतं.

भारताचे पुढील सामने 

भारताला पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध पुढील रविवारी खेळायचा आहे. यानंतर 3 नोव्हेंबरला टीम इंडियाची अफगाणिस्तानशी स्पर्धा होईल. आणि मग भारत पहिल्या फेरीतून पात्र झालेल्या दोन संघांशी स्पर्धा करेल ते म्हणजे स्कॉटलंड आणि नामिबिया. या दोन संघांविरुद्ध टीम इंडियाला सहज विजय मिळू शकतो, पण उर्वरित संघांविरुद्ध विजयाची शाश्वती देणं कठीण आहे.

रस्ता कठीण असणार

लक्षात ठेवा फक्त दोनच संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. म्हणजेच टीम इंडियाला फक्त त्याचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार नाहीत, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. या गटात अफगाणिस्तानसह एकूण 4 मजबूत स्थितीत आहेत. अशा स्थितीत दोन बड्या संघांना बाहेरचा मार्ग मिळणार आहे.

ग्रुप 2ची सध्याची परिस्थिती

सध्या पाकिस्तान 2 गुणांसह ग्रुप 2 मध्ये अव्वल आहे. 10 गडी राखून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. सध्या भारताचा नेट रन रेट -0.973 आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला आगामी सामन्यांमध्येही रनरेट सुधारावा लागणार आहे. 2016 च्या टी -20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या हातून दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र असं असतानाही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला होता.