गौतम गंभीर युगात 'हा' युवा खेळाडू दुर्लक्षित, क्रिकेट कारकिर्द संपल्यात जमा? आता एकच मार्ग...

IND VS SL Squad : श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. टी20 संघासाठी सुर्यकुमार तर एकदिवसीय संघासाठी रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

राजीव कासले | Updated: Jul 19, 2024, 05:57 PM IST
गौतम गंभीर युगात 'हा' युवा खेळाडू दुर्लक्षित, क्रिकेट कारकिर्द संपल्यात जमा? आता एकच मार्ग... title=

IND VS SL Squad : श्रीलंका दौऱ्यासाठी टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) दोन वेगवेगळ्या संघांची घोषणा केली आहे. टी20 संघासाठी सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) तर एकदिवसीय संघासाठी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मधल्या फळीत श्रेयस अय्यरचं (Shreyas Iyer) संघात कमबॅक झालंय. एकदिवसीय संघात श्रेयर अय्यरची वर्णी लागली आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये अय्यरने शानदार कामगिरी केली होती. पण यानंतर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. स्थानिक क्रिकेट खेळण्यास नकार दिल्याने अय्यरवर ही कारवाई झाली. त्याला बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही बाहेर काढण्यात आलं. 

या खेळाडूची क्रिकेट कारकिर्द संपली?
श्रेयस अय्यरबरोबरच आणखी एका खेळाडूला सेंट्रल कॉन्ट्रेक्टमधून बाहेर काढण्यात आलं होतं. या खेळाडूचं नाव आहे ईशान किशन (Ishan Kishan). श्रेयस अय्यरचं संघात पुनरागमन झालं. पण ईशान किशनकडे मात्र पुन्हा दुर्लक्षित राहिला आहे. 

8 महिन्यापासून टीम इंडियातून दूर
गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनताच श्रेयस अय्यरला चांगले दिवस आले. अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाई रायडर्सने यंदाच्या हंगामातील आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. या संघाचा मेंटोर गौतम गंभीर होता. पण याबाबतीत ईशान किशन कमनशीबी ठरला. श्रीलंका दौऱ्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतही ईशान किशनच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. ईशान किशन गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा खेळला होता. गुवाहाटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 सामन्यात त्याने टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं.

ईशानने घेतला होता ब्रेक
त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विश्रांतीच गरज असल्याचं सांगत त्याने ब्रेक घेतला. पण यानंतर तो स्थानिक क्रिकेटही खेळला नाही. या दरम्यान बडोद्यात तो हार्दिक पांड्याबरोबर आयपीएलसाठी सराव करताना दिसला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात ईशान मुंबई इंडियन्ससाठी खेळला. पण स्थानिक क्रिकेट न खेळण्याच्या भूमिकेमुळे बीसीसीआय नाराज झालं. आता स्थानिक क्रिकेट खेळल्यानंतरच त्याला टीम इंडियाचे दरवाजे उघडू शकतात. 

स्थानिक क्रिकेटचं महत्व
बीसीसीआयने मीडियाला दिलेल्या निवेदनात स्थानिक क्रिकेट 2024-25 हंगामात खेळणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवर नजर ठेवली जाईल असं म्हटलं आहे. आसामकडून खेळणाऱ्या रियान परागला गेल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीत केलेल्या शानदार कामगिरीचा फायदा झाला. या स्पर्धेत रियानने तब्बल सात अर्धशतकं ठोकली होती. आता ईशान किशनलाही पुन्हा एकदा स्थानिक क्रिकेटमध्ये आपली कामगिरी सिद्ध करावी लागणार आहे.