अजिंक्य रहाणेचा फ्लॉप शो सुरुच; टीममध्ये पुन्हा मिळणार संधी?

तिसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आला असूनही त्याला पहिल्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही.

Updated: Jan 12, 2022, 02:45 PM IST
अजिंक्य रहाणेचा फ्लॉप शो सुरुच; टीममध्ये पुन्हा मिळणार संधी? title=

केपटाऊन : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणे आऊट ऑफ फॉर्म आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याचा समावेश करण्यात आला असूनही त्याला पहिल्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही. आऊट करार दिल्यानंतर रिव्यू फुकट घालवल्याने त्याच्यावर अनेक टीका होतायत. त्यामुळे आता अजिंक्य रहाणेचं करियर जणू संपलंच आहे असं अनेकांना वाटतंय. त्याला पुन्हा संधी मिळणार का यावर टीम इंडियाचे बॅटींग कोच विक्रम राठोड यांनी मत व्यक्त केलं आहे.

टीम इंडियाच्या बॅटींग कोच विक्रम राठोड यांनी अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीबाबत मोठं वक्तव्य केलंय. टीम इंडियामध्ये सातत्याने फ्लॉप होणाऱ्या अजिंक्य रहाणेला आणखी किती संधी मिळणार, हे त्यांनी स्पष्ट केलंय. केपटाऊनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 9 धावा करून अजिंक्य रहाणे आऊट झाला.

12 बॉलमध्ये 9 धावा करून अजिंक्य रहाणे कागिसो रबाडाच्या ओव्हरमध्ये आऊट झाला. यानंतर राठोड म्हणाले, "अजिंक्य रहाणे मोठी खेळी कशी करणार ही सध्या चिंतेची बाब आहे. या मालिकेत अजिंक्य रहाणेने एक-दोन महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत. मात्र त्याला मोठी खेळी खेळता आलेली नाही."

विक्रम राठोड म्हणाले, "या डावात अजिंक्य रहाणे चांगली धावसंख्या करेल अशी टीम मॅनेजमेंटची अपेक्षा आहे. मी एवढंच सांगू शकतो की, लोकांना वाटतं त्यापेक्षा अधिकवेळा टीम मॅनेजमेंट खेळाडूंना त्यापेक्षा संधी देते. आतापर्यंत रहाणेला आणखी किती संधी दिल्या जातील याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. तो सर्वोत्तम प्रयत्न करतोय., तो नेटमध्ये चांगली फलंदाजी करताना दिसतोय."

फलंदाजांवर भडकले कोच

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी मंगळवारी सांगितलं की, "दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीची कामगिरी अत्यंत खराब होती." विराट कोहलीला ऑफ-साइड गेममध्ये शिस्तबद्ध राहण्याचा फायदा झाला. कोहलीने 79 रन्सची संयमी खेळी करत अर्धशतक झळकावलं. पण भारतीय संघ पहिल्या डावात 223 धावांवर गारद झाला.