भारत-पाक क्रिकेट सुरक्षेबाबत गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव नाही

भारत आणि पाकिस्तानदरम्यान मालिकेसाठी सुरक्षेबाबत कोणतेही आवेदन आले नसल्याचे स्पष्टीकरण भारताच्या गृहमंत्रालयाने दिले आहे. दोन्ही देशांदरम्यानची मालिका त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याने भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) गृहमंत्रालयाला आवेदन पाठवले नसल्याचे सांगितले जात आहे.

Updated: Nov 27, 2015, 01:29 PM IST
भारत-पाक क्रिकेट सुरक्षेबाबत गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव नाही title=

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान मालिकेसाठी सुरक्षेबाबत 'बीसीसीआय'कडून आपल्याला कोणतंही निवेदन मिळालं नसल्याचं स्पष्टीकरण भारताच्या गृहमंत्रालयाने दिलंय... त्यामुळे, क्रिकेटपटूंच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

दोन्ही देशांदरम्यानची मालिका त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार असल्यानं भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) गृहमंत्रालयाला आवेदन पाठवले नसल्याचं सांगितलं जातंय. आंतरराष्ट्रीय सामने देशात होत असतील तर त्यासाठी गृहमंत्रालयाकडून सुरक्षेची मंजुरी मिळणे आवश्यक असते. मात्र, ही मालिका भारतात होण्याची शक्यता नसल्याने बीसीसीआयनं गृहमंत्रालयाशी संपर्क केला नाही. 

सूत्रांच्या माहितीनुसार, जर एखादी क्रिकेट मालिका तिसऱ्या देशात होत असेल तर परराष्ट्र मंत्रालयाकडून मंजुरी आवश्यक असते. परराष्ट्र मंत्रालयाने प्रस्ताव स्वीकारल्यानंतरच ज्या देशात मालिका खेळवण्यात येणार आहे त्या ठिकाणी गृहमंत्रालय सुरक्षा दल पाठवते. 

दरम्यान, भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका होणार असल्याची चर्चा रंगत असली तरी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी मात्र या मालिकेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं म्हटलंय. ट्विटरवरुन त्यांनी ही माहिती दिलीय. त्यामुळे या मालिकेबाबतची अनिश्चितता अद्याप कायम आहे.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.