रागावलेल्या बायकोचा सामना करणं महाकठिण - सचिन

सचिन तेंडुलकरनं आपल्या बॅटींगनं भल्याभल्यांची दाणादाण उडवलीय पण बॅटींगपेक्षा रागावलेल्या पत्नीचा सामना करणं कठीण असल्याचं मास्टर ब्लास्टरला वाटतंय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 23, 2012, 08:49 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
सचिन तेंडुलकरनं आपल्या बॅटींगनं भल्याभल्यांची दाणादाण उडवलीय पण बॅटींगपेक्षा रागावलेल्या पत्नीचा सामना करणं कठीण असल्याचं मास्टर ब्लास्टरला वाटतंय
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन दशकांपेक्षा जास्त वेळ व्यतित केलेल्या सचिननं ‘संवाद लिजंडशी’ या पुस्तकात क्रिकेटहून वेगळ्या विषयांवरदेखील भाष्य केलंय. लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सचिनला एक हलका-फुलका प्रश्न विचारला गेला होता... जास्त भयानक कोण? रागात असलेला बॉलर की रागात असलेली बायको?... त्याच अंदाजाच सचिननंही उत्तर दिलं... ‘तुम्ही तर मला मोठ्या पेचात टाकलंय. मी सध्या घराच्या बाहेर आहे म्हणून हे उत्तर देऊ शकतोय... की रागावलेली बायको...’
यावेळी संपूर्ण करिअरमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या लोकांचंही सचिननं आभार मानले. यावेळी आपले वडील, मोठा भाऊ तसचं आपल्या पत्नीसह सचिननं आणखी तीन स्त्रियांच्या नावाचाही उल्लेख केला. ‘मी सुरुवात माझ्या आईपासून करेन. तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही. माझ्या जेवणाकडे तिचं कडक लक्ष असायचं. त्याचमुळे मी तासनतास अभ्यास करू शकलो. माझ्या आईचंही करिअर होतं. ऑफिसमध्ये अनेक तास काम करूनही तिचं घराकडे संपूर्ण लक्ष असायचं’ असं म्हणत सचिन आपल्या बालपणीच्या काळात हरवला.
‘मी क्रिकेट खेळायला सुरूवात केल्यामुळे मला माझी शाळा बदलावी लागली. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी मला तेव्हा दोन बसमधून प्रवास करावा लागत होता. त्यानंतर मला पुन्हा प्रॅक्टीससाठी जावं लागत असे. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांनी माल माझ्या काका-काकूंकडे सोडण्याचा निर्णय घेतला. मी प्रॅक्टीस करत असलेल्या ठिकाणापासून त्यांचं घर खूपच जवळ होतं आणि शाळाही ’ असं म्हणतानाच सचिननं पत्नी अंजलीचाही उल्लेख करत तिनंच जीवनात नव्या गोष्टी शिकवल्या असं कबूलही केलं.

‘माझी पत्नी माझ्या जीवनातला महत्त्वपूर्ण भाग आहे. १९९०मध्ये आमच्या दोघांची भेट झाली. गेली २१ वर्ष ती मला ओळखतेय. हा खूप मोठा कालावधी आहे. तिनं माझ्या करिअरमधले प्रत्येक चढ-उतार माझ्यासोबत अनुभवलेत. माझ्या प्रत्येक कठोर प्रसंगी ती माझ्यामागे खंबीरपणे उभी राहिली. माझ्या जीवनातल्या सर्वात कठिण प्रसंगी तिनंच मला जीवनातल्या दुसऱ्या चेहऱ्याशी ओळख करून दिली. जेव्हा जेव्हा मी निराश झालो तिनंच मला वेगळ्या पद्धतीनं विचार करायला शिकवलंय. मला आजपर्यंत जे मिळालंय त्याबद्दल देवाचे आभार मानणे आणि जे मिळालं नाही त्याबद्दल तक्रार न करणं, हेही अंजलीनंच मला शिकवलंय. त्यामुळेच जीवनाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहूत माझ्या करिअरला वेगळं वळण मिळत गेलं. त्यामुळे मी तिचाही आभारी आहे’, असं म्हणताना सचिन भावूक झाला होता.