`माझा अमर गेला, पण नेव्हीला धडा शिकवायलाच हवा`

ही बातमी आहे एका आईच्या लढ्याची.... डोंबिवलीला राहणाऱ्या अनुराधा पळधे यांच्या लढ्याची... अनुराधा पळधे यांचा नौदलाशी गेली सतरा वर्षं न्यायालयीन लढा सुरु आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 18, 2013, 11:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ही बातमी आहे एका आईच्या लढ्याची.... डोंबिवलीला राहणाऱ्या अनुराधा पळधे यांच्या लढ्याची... अनुराधा पळधे यांचा नौदलाशी गेली सतरा वर्षं न्यायालयीन लढा सुरु आहे. त्यांचा मुलगा अमर पळधे याच्या मृत्युला नौदल अधिकाऱ्यांचा बेजवाबदारपणाच कारणीभूत असल्याचं अखेर १७ वर्षाच्या न्यायालयातील लढाईनंतर सिद्ध करण्यात त्या यशस्वी ठरल्यात.
नौदलात ‘डायव्हर’ म्हणजेच पाणबुड्या म्हणून अमर पळधेची १९९१ ला निवड झाली. आंध्रप्रदेशातल्या काकिनाडा किनाऱ्यावर दैनंदिन सरावादरम्यान २१ सप्टेंबर १९९३ ला अमरचा दुर्देवी मृत्यू झाला. अमरच्या मृत्युची शहानिशा करताना हा मृत्यु अपघाती नसल्याचं पळधे कुटुंबीयांच्या लक्षात आलं. पत्रव्यवहार करुन, नौदलांच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही नौदल सत्य लपवत असल्याचं पळधे कुटंबीयांचा दावा होता. अखेर त्यांनी १९९६ ला स्थानिक काकिनाडा कोर्टात धाव घेतली. तेव्हापासून गेली १७ वर्ष त्यांची नौदलाशी ही न्यायालयीन लढाई सुरू होती.

स्थानिक काकिनाडा न्यायालयापासून हा लढा आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयापर्यंत पोहचला. अखेर उच्च न्यायालयाने संबंधित नौदल अधिकाऱ्यांवर पोलीस कारवाईचे आदेश दिले आहेत. नौदलानं सत्य लपवताना या न्यायालयीन लढाईत असंख्य अडथळे आणले. न्यायालयात खटला जरी जिंकला असला तरी जोपर्यंत अधिकाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नसल्याचं अनुराधा पळधे यांनी स्पष्ट केलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.