कसाबचे येरवड्यात दफन - मुख्यमंत्री

दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आल्याने सर्वत्र संदेश गेला आहे की, या देशात कायद्याचे राज्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 21, 2012, 11:23 AM IST

www.24taas.com,मुंबई
दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आल्याने सर्वत्र संदेश गेला आहे की, या देशात कायद्याचे राज्य आहे, अशी प्रतिक्रिया देताना कसाबचे येरवड्यामध्येच मुस्लिम रितीरिवाजानुसार दफन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले, पुण्यातील येरवडा तुरूंगात कसाबला केले दफन करण्यात आलं आहे. कसाबने मृत्यूपत्र केलेले नाही. कायद्याची अंमलबजावणी करून कसाबला फाशी दिली. त्यामुळे या देशात कायद्याचे राज्य आहे हा संदेश दिला आहे.
कसाबला आज सकाळी फाशी देण्यात आली. त्यानंतर त्याला येरवड्यामध्येच मुस्लिम रितीरिवाजानुसार दफन करण्यात आले. भारतात कायद्याचे राज्य मजबूत आहे, हे यामुळे स्पष्ट झाले आहे, चव्हाण म्हणालेत.
कायद्याच्या प्रक्रियेत कोणालाही वेगळा न्याय देण्यात येत नसून, प्रत्येकाला समान न्याय मिळतो, हेही यामुळे जाहीर झाले. कायद्याचा योग्य पालन केल्याचे हे उदाहरण आहे. सुरक्षेसाठी ही गुप्तता पाळण्यात आली होती, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
क्रुरकर्मा आणि पाकिस्तानी नागरिक. लष्कर-ए-तैयबा या संघटनेचा दहशतवादी असलेल्या अजमल कसाब याला फाशी देऊन त्याचा शेवट करण्यात आलाय. त्यांने आणि त्याचे सहकारी अन्य नऊ दहशतवाद्यांनी, २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईच्या विविध भागांत हल्ले करून तब्बल चार दिवस मुंबईला वेठीस धरले होते.
पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये क्रुरकर्मा अजमल कसाब हाच पोलिसांच्या हाती जिवंत सापडला होता. त्याला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, उशीर होत असल्यामुळे देशभरतातून संताप व्यक्त होत होता.
काल त्याला पुण्यातील येरवडा तुरूंगात हलविण्यात आले होते. आज सकाळी ७.३० वाजता कसाबला फाशी देण्यात आले. त्याच्या फाशीचे वृत्त समजताच देशात फटाके फोडून जल्लोष करण्यात येत आहे.