‘बेस्ट’च्या तिकीटांत पुन्हा होणार दरवाढ

महागाईनं सामान्यांना आणखी एक धक्का दिलाय. इंधन, गॅस, रिक्षा-टॅक्सी दरवाढीपाठोपाठ आता बेस्ट बसेसच्या तिकिटांच्या दरातही वाढ होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 10, 2012, 08:34 AM IST

www.24taas.com, मुंबई
महागाईनं सामान्यांना आणखी एक धक्का दिलाय. इंधन, गॅस, रिक्षा-टॅक्सी दरवाढीपाठोपाठ आता बेस्ट बसेसच्या तिकिटांच्या दरातही वाढ होणार आहे.
एप्रिल २०१३ पासून बेस्टचं किमान भाडं एका रूपयानं वाढणार आहे. याचाच अर्थ प्रवाशांना पाच रूपयांऐवजी सहा रूपये मोजावे लागतील. मंगळवारी बेस्ट समितीची बैठक झाली या बैठकीत भाडेवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला. याआधी बेस्टनं २००८ साली किमान भाडं तीन रूपयांवरून चार रूपये केलं होतं. त्यानंतर २०१२ मध्ये किमान भाड्यासहित दरांत आणखी वाढ करण्यात आली... यावेळी किमान भाडं झालं पाच रुपये. आता पुन्हा पुढच्या वर्षापासून हे भाडं सहा रूपये होईल.
मात्र, प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयावर युतीच्या नगरसेवकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. बेस्टच्या प्रस्तावित भाडेवाढीबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. आधीच महागाई असल्यानं ही भाडेवाढ म्हणजे सामान्य प्रवाशांच्या खिशातून लूट करण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होतेय.