नील-स्वानंदीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का ?

 झी मराठीवरील ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेत सध्या देशपांडे कुटुंबिय नील-स्वानंदीच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत.

Updated: Dec 8, 2015, 07:52 PM IST
नील-स्वानंदीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का ? title=

‘नांदा सौख्य भरे’ मालिकेचा दोन तासांचा विशेष भाग

 
मुंबई : झी मराठीवरील ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेत सध्या देशपांडे कुटुंबिय नील-स्वानंदीच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. स्वानंदीला सून म्हणून घरात न आणण्याचा घाट घालणारी ललिता आणि काहीही झालं तरी नील (इंद्रनील) आणि स्वानंदीचं लग्न लावूनच देणार असा चंग बांधलेली वच्छी आत्या या दोघींच्या शह-काटशहाच्या खेळात हे लग्न अडकलेलं आहे. 

हे लग्न होऊ नये म्हणून ललिता हर एक प्रकारे प्रयत्न करतेय तर त्या सर्व अडचणींवर मात करत वच्छी ही लग्न गाठ जुळवण्याचा प्रयत्न करतेय. एकीकडे नील-स्वानंदीच्या लग्नात या अडचणी तर दुसरीकडे व्हिजा मिळेपर्यंत लग्न न करण्याचा निश्चय करणारी संपदा या सर्वांमुळे देशपांडे कुटुंबियही चिंतेत आहे. 

या सर्व अडथळ्यांच्या शर्यती पार करत ही दोन्ही लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का? या प्रश्नाचं उत्तर बघायला मिळेल दोन तासांच्या एका विशेष भागात. येत्या १३ डिसेंबरला रविवारी रात्री ७ ते ९ या वेळेत ‘नांदा सौख्य भरे’ चा हा विशेष भाग झी मराठीवरून प्रसारित होईल.

आपल्या खोट्या श्रीमंतीचा बडेजाव करणारी आणि कर्ज-उधा-यांच्या फे-यात अडकलेली ललिता आपलं हे सत्य बाहेर येऊ नये म्हणून सतत प्रयत्न करत असते. आपल्या या खोट्या वैभवामागील सत्य ती स्वानंदी आणि तिच्या घरच्यांनाही कळणार नाही यासाठी नियोजनबद्ध खेळी आखत असते. 

स्वानंदीचे वडिल आयकर विभागात मोठ्या पदावर आहेत त्यामुळे त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल आणि स्वानंदीला सून म्हणून आणल्यानंतर या नात्याच्या आधारे देशपांडेंकडून तो पैसा उकळता येईल असा ललिताचा कट असतो. परंतू देशपांडे हे एक अतिशय प्रामाणिक अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे वरकमाईचा पैसा नसल्याचं कळाल्यापासून ललिताच्या सगळ्या आशा अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत त्यामुळे हे लग्न होऊ देण्याचा ती हरेक प्रकारे प्रयत्न करतेय. परंतु दुसरीकडे वच्छी आत्या तिचे हे सारे प्रयत्न हाणून पाडते. 

कर्जबाजारी होऊनही स्वतःची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी ललिताकडे आपलं घर विकण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. एकीकडे नीलच्या लग्नाची आणि दुसरीकडे हे घर विकण्याची तयारी अशा दोन्ही गोष्टी एकत्र सुरू असल्यामुळे ललिता विचित्र पेचप्रसंगात अडकलेली आहे. यातही घर विकण्याची गोष्ट तिला कुणालाही कळू द्यायची नाही या लपवाछपवीत तिची तारांबळ उडालेली आहे. 

या सर्व गोष्टी मात्र वच्छी आत्याच्या लक्षात येतात. त्यामुळे ललिताचं हे भांडाफोड होणार का? आणि सत्य परिस्थिती देशपांडे कुटुंबियासमोर येणार का? हेही या विशेष भागात बघायला मिळणार आहे. स्वानंदीसोबतच संपदाचंही लग्न त्याच मांडवात होणार आहे. लग्नानंतर महेशसोबत परदेशात जाण्यासाठीचा व्हिजा मिळाल्याशिवाय आपण बोहल्यावर उभी राहणार नाही असा निर्णय संपदा घेते. हा निर्णय मागे घेण्यासाठी स्वानंदी तिची समजूत काढते आणि व्हिजाचं काम नक्की होईल असा विश्वास देते. 

लग्नाची वेळ जवळ येते आणि तिला व्हिजा नाकारला गेल्याचं कळतं.. यानंतर संपदा काय निर्णय घेते हे बघणंही उत्सुकतेचं ठरेल. अशा अनेक नाट्यमय घटना घडामोडींनी भरलेला हा दोन तासांचा विशेष भाग असणार आहे. या घडामोडींचा शेवट काय होतो ? आणि ही दोन्ही लग्नसोहळे निर्विघ्नपणे पार पडतात का ? याचा उलगडा रविवारी रात्री ७ वा. प्रसारित होणा-या ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेच्या या विशेष भागातून होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.