२६/११चा मास्टरमाईंड लकवीला जामीन, पण सुटका नाही

दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलू अशी वल्गना पाकच्या पंतप्रधानांनी केली असतानाच पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी कोर्टानं २६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीर उर रेहमान लखवीला जामीन मंजूर केला आहे. 

Updated: Dec 18, 2014, 09:48 PM IST
२६/११चा मास्टरमाईंड लकवीला जामीन, पण सुटका नाही title=

लाहोर: 26/11चा गुन्हेगार झकी उर रहमान लखवीला जामीन देण्यात आला असला तरी त्याची जेलमधून सुटका होणार नसल्याचं पुढं आलंय. कारण चौफेर टीका होत असल्यामुळं पाकिस्तान सरकारनं त्याची सुटका न करण्याचा निर्णय घेतलाय.

ज्या कोर्टात झकी उरला जामीन मिळलाय त्या कोर्टाच्या न्यायाधिशाला दहशतवाद्यांनी पेशावर विसरू नका अशी धमकी दिली होती. त्यानंतर आज सुनावणीच्या वेळी सरकारी वकील गैरहजर नव्हता....त्यामुळं आता चौफेर टीका होत असल्यानं पाकिस्ताननं झकी उरची सुटका करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. 

यापूर्वी, दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलू अशी वल्गना पाकच्या पंतप्रधानांनी केली असतानाच पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी कोर्टानं २६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीर उर रेहमान लखवीला जामीन मंजूर झाला. या विरुद्ध सर्व स्तरातून टीका झाली. 

एकीकडे मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद पाकमध्ये मोकाट फिरत असतानाच लखवीलाही जामीन मिळाल्यानं तीव्र संताप व्यक्त झाल्या. 

२६/११च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी झकीर उर रेहमान लखवी आणि अन्य सात जणांविरोधात पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयात खटला सुरु आहे. याप्रकरणी पाकमधील सुरक्षा यंत्रणांनी लखवी, अब्दूल वाजीद, मझहर इक्बाल, शाहीद जमील रियाझ, जमील अहमद आणि युसूफ अंजूम यांना २००९मध्ये अटक केली होती.

या सर्वांविरोधात मुंबई हल्ल्यांचा कट रचणं, आर्थिक सहाय्य करणं अशा विविध कलमांखाली खटला सुरु आहे. याप्रकरणातील झकीर उर रेहमान लखवीला गुरुवारी पाकिस्तानमधील कोर्टानं पाच लाख रुपयांच्या बाँडवर जामीन मंजूर केला होता.  

मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकमधील सुनावणीप्रक्रिया संथगतीनं सुरु असल्याचं भारतानं वारंवार निदर्शनास आणून दिलं आहे. पाकिस्तान दहशतवादाविरोधात गंभीर असेल तर त्यांनी आधी हा खटला झटपट निकाली काढावा अशी मागणीही भारतानं केली होती. 

पेशावरमधील शाळेवर दहशतवादी हल्ला झाल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची घोषणा केली होती. यानुसार फाशीच्या शिक्षेवरील बंदी तातडीनं उठविली आणि दहशतवादाविरुद्ध सात दिवसांत ठोस कृती आराखडा तयार करण्याचा निश्चयही शरीफ यांनी जाहीर केला होता. मात्र या गर्जनेला २४ तासांचा कालावधी लोटला असतानाच पाकमधील कोर्टानं रेहमानला जामीन दिला आहे. या निर्णयावर भारतानं नाराजी दर्शवली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.