<b>पराभव ओळखून सोनियांनी राहुलला वाचवलं, मोदी बरसले!</b>

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा अखेरचा दिवस मोदींनी गाजवला. काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळेच राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या नावाची घोषणा झाली नाही अशी तोफ मोदींनी डागली. राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाची चिरफाड मोदींनी केलीय. भारताला आता स्वराज्यासह सुराज्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 19, 2014, 07:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा अखेरचा दिवस मोदींनी गाजवला. काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळेच राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या नावाची घोषणा झाली नाही अशी तोफ मोदींनी डागली. राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाची चिरफाड मोदींनी केलीय. भारताला आता स्वराज्यासह सुराज्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले.
`समोर संकट दिसत असताना कुठलीही आई आपल्या मुलाला त्यात ढकलत नाही. उलट ती त्याचा बचाव करते. त्यानुसारच, काँग्रेस पक्ष संकटात असल्यानं राहुल गांधींना पंतप्रधानपदाची उमेदवारी न देऊन सोनिया गांधींनी त्यांना वाचवलं आहे`, अशी मार्मिक टिप्पणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
`एका खालच्या जातीच्या चहावाल्याविरुद्ध निवडणूक लढणं, उच्च कुळात वाढलेल्या लोकांना कमीपणाचं वाटतंय, तो त्यांना अपमान वाटतोय. कारण, त्याच्या मनात जातीयवादाचं विष भरलंय, उच्च-नीच भेदभावानं त्यांना ग्रासून टाकलंय. ते नामदार आहेत आणि मी कामदार आहे. त्यात आता कुणाला निवडायचं हे तुम्ही ठरवा`, अशा शब्दांत मोदींनी बहुजनांना साद घातली.
नवी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय परिषद बैठकीच्या समारोपावेळी मोदींनी काँग्रेसवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठवली. पक्ष वाचवण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरु आहे तर भाजपचा देश वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं यावेळी मोदींनी सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.