चिनी सामानाच्या बहिष्काराने भारतालाच होईल नुकसान : चीन

 दिवाळीला चिनी सामानवर बहिष्कार करण्याची काही जणांच्या आवाहनानंतर चीनचा तीळपापड झाला आहे. संतापलेल्या चीनने भारताला अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. 

Updated: Oct 28, 2016, 07:18 PM IST
चिनी सामानाच्या बहिष्काराने भारतालाच होईल नुकसान : चीन title=

नवी दिल्ली :  दिवाळीला चिनी सामानवर बहिष्कार करण्याची काही जणांच्या आवाहनानंतर चीनचा तीळपापड झाला आहे. संतापलेल्या चीनने भारताला अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. 

चिनी सामानांवर भारताने बहिष्कार टाकला तर चीन भारतातील गुंतवणूक कमी करेल तसेच दोन्ही देशातील परस्पर सहकार्यावर याचा परिणाम होईल, असे चीनकडून अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. 

नवी दिल्लीत चीनच्या दूतावासाकडून सांगण्यात आले की अशा प्रकारे बहिष्कार टाकून चीनच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नाही. पण त्यामुळे उलट भारताचे अधिक नुकसान होईल. भारतातील व्यापारी आणि ग्राहकांकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध राहणार नाही. 

चीनने म्हटले की तो जगातील सर्वात मोठा व्यापारी देश आहे. २०१५ मध्ये त्याची निर्यात २२७.५ अब्ज डॉलर होता. भारताला करण्यात आलेली निर्यात एकूण निर्यातीच्या दोन टक्के आहे. 

दरम्यान, भारत सरकारकडून अधिकृतपणे बहिष्काराची अधिकृत घोषणा केली नाही. पण किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॅटने यंदाच्या दिवाळीत चिनी वस्तूच्या आयातीत ३० टक्के घट होण्याची शक्यता वर्तवली होती. 

भारत पाकिस्तानातील तणावाच्या परिस्थितीत चीनने पाकला दिलेले झुकते माप यामुळे चिनी सामानावर बहिष्कार टाकण्याचे बोलले जाते होते. सोशल मीडिया आणि अनेक माध्यमातून बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला अनेकांनी सकारात्मक पाठिंबा दिला. सध्या चीन आपल्या स्वस्त वस्तूंमुळे जागतिक बाजारात मोठे स्थान बनवले आहे.