टीम इंडियाला `तो` सामना खेळायचाच नव्हता, पण...

टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी घशात घातली, मात्र, शेवटी २०-२० ओव्हर्सचा झालेला हा अंतिम सामना टीम इंडियाला खेळायचाच नव्हता, असा खुलासा आता झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 3, 2013, 04:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी घशात घातली, मात्र, शेवटी २०-२० ओव्हर्सचा झालेला हा अंतिम सामना टीम इंडियाला खेळायचाच नव्हता, असा खुलासा आता झालाय.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळताना पावसानं खो घातला. त्यामुळे सामन्याच्या ओव्हर्स कमी करून २०-२० ओव्हर्सची मॅच जाहीर करण्यात आली. यावेळी टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध २० ओव्हरची मॅच खेळायला नकार दिला होता, अशी बाब आता समोर आलीय. कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनंही ही मॅच खेळायला नकार दर्शवला होता. परंतु, आयसीसीच्या टेक्निकल कमिटीनं टीम इंडियाला खेळायला भाग पाडलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) च्या मॅनेजमेंट टीमनं या निर्णयाविरोधात आयसीसीमध्ये आपला विरोधही व्यक्त केला होता. पण, टीम इंडियाला आयसीसीचा निर्णय मान्य करावाच लागला. पण, या निर्णयाला टीम इंडियाची नापसंती होती, हे उघड आहे.

टीम इंडियाची तयारी ५० ओव्हर्सच्या मॅचसाठी होती. अचानक २०-२० ओव्हर्सच्या मॅचमुळे सगळे डावपेच चुकण्याचीही शक्यता होती. पण, या मॅचमध्ये पारडं भारताच्या बाजूनं झुकलं आणि टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर ताबा मिळवला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.