सैन्य भरतीची प्रक्रिया सुरू; प्रशासन सतर्क

जळगावनंतर आता सैन्य भरतीची प्रकिया औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. जळगावमध्ये गेल्या ३० नोव्हेंबरपासून ६ डिसेंबरपर्यंत सैन्य भरती सुरू होती.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 7, 2012, 04:23 PM IST

www.24taas.com, जळगाव / औरंगबाद
जळगावनंतर आता सैन्य भरतीची प्रकिया औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. जळगावमध्ये गेल्या ३० नोव्हेंबरपासून ६ डिसेंबरपर्यंत सैन्य भरती सुरू होती. भरतीसाठी उमेद्वारांची जिल्हा क्रीडा संकूल आणि पोलीस मैदानावर एकच गर्दी केली होती... त्यामुळे आता औरंगाबादही अगोदरच सतर्क झालंय.
गुरुवारी ६ डिसेंबर रोजी या ठिकाणी तब्बल ५० हजार उमेदवारांनी हजेरी लावली होती. ३ डिसेंबर रोजीही अशीच गर्दी उसळली होती. त्यामुळे प्रशासनाची आणि पोलीस अधिकाऱ्यांची मात्र झोप उडाली होती. सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासन व पोलिस दलाने सतर्कता बाळगत ५० हजार उमेदवारांच्या प्रचंड गर्दीवर ताबा ठेवत भरती प्रक्रिया मध्यरात्रीच सुरळीत सुरू करुन दिली होती. मध्यरात्री १ वाजता उमेदवारांच्या उंची मोजमापानंतर सुरू झालेली भरती प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चालू होती. जिल्ह्यातल्या शेवटच्या दिवशी ९ जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांमुळे अंदाजित होणारी गर्दी याचे आकडे प्रशासनाकडून वर्तविले जात होते. या आकड्यांना सार्थ ठरवत सुमारे २५ हजार उमेदवार बुधवारी सायंकाळपर्यंत शहरात दाखल झाले होते. २५ हजार उमेदवारांच्या शहरातील उपस्थितीमुळे शहरातील रस्ते गर्दीने ओसंडून वहात होते. मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित राहणार असल्याचे लक्षात घेऊन सैन्यदलाच्या वतीने रात्री एकनंतर उमेदवारांच्या उंची तसेच इतर शारिरीक चाचण्या घेण्यात येत होत्या.
आजपासून औरंगाबाद जिल्ह्यात भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सुमारे ५ हजार उमेदवारांनी काल सायंकाळपासूनच जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर रांगा लावण्यास सुरुवात केली होती. ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.