दुष्काळग्रस्तांच्या नरड्यावर ‘काँग्रेसचा हात’!

दुष्काळग्रस्तांच्या पैशावर काँग्रेसचा प्रचार सुरु असल्याची धक्कादायक बाब उस्मानाबाद जिल्ह्यात समोर आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 7, 2013, 10:57 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, उस्मानाबाद
दुष्काळग्रस्तांच्या पैशावर काँग्रेसचा प्रचार सुरु असल्याची धक्कादायक बाब उस्मानाबाद जिल्ह्यात समोर आलीय.
सरकारी अनुदानावर सुरु असलेल्या गुरांच्या चारा छावणीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रत्येक गोठ्यावर, झोपडीवर काँग्रस पक्षाचे शेकडो झेंडे लावण्यात आलेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या पहाणी दौऱ्यादरम्यान ही बाब समोर आली. ‘झी मीडिया’नं काँग्रेसच्या या प्रचाराचे चित्रीकरण करताच काँग्रेस कार्यकर्त्यांची एकच पळापळ सुरु झाली. त्यांनी काही झेंडे तातडीनं काढले. मात्र, झेंड्यांची संख्याच इतकी होती की कार्यकर्त्यांची ही पळापळ व्यर्थ ठरली आणि सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

चारा छावणीला भेट देण्यास आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना कार्यकर्त्यांचा बचाव कसा करावा यासाठी शब्दच सापडत नव्हते. दुष्काळग्रस्तांच्या जीवावर सुरु असलेल्या या काँग्रेसच्या प्रचाराचा उस्मानाबादकरांनीही निषेध केलाय.