यवतमाळात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये घमासान

यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसचे अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा हा जिल्हा असल्यानं यात कुरघोडीचे राजकारण आहे. त्यामुळं संतापलेल्या माणिकरावांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

Updated: Nov 13, 2011, 03:16 PM IST

झी २४ तास वेब टीम, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसचे अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा हा जिल्हा असल्यानं यात कुरघोडीचे राजकारण आहे. त्यामुळं संतापलेल्या माणिकरावांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलय.

राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षावर कुरघोडीची एकही संधी सोडत नाही. आता थेट प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडलय. सहा वेळा खासदार राहिलेले उत्तमराव पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळं संतापलेल्या माणिकरावांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तोफ डागली. जिल्ह्याबाहेरच्या व्यक्ती जिल्ह्याच्या राजकारणात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्यांनी अजितदादांचा नामोल्लेख न करता केला.

राज्यात नेतृत्वानं जिल्ह्यात सर्वांना संभाळून वाटचाल केली नसल्याचा आरोप उत्तमराव पाटील यांनी माणिकरावांवर केलाय. राष्ट्रवादीच्या खेळीला उत्तर देण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न चालवले आहेत. वणीचे उपनगराध्यक्ष राकेश खुराणा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आता त्या पाठोपाठ मनसेचे जिल्हाध्यक्ष अजय पुरोहीत काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.