महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपच्या सोशल मीडिया कंपनीचा वापर - पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.  

Updated: Jul 24, 2020, 03:17 PM IST
महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपच्या सोशल मीडिया कंपनीचा वापर - पृथ्वीराज चव्हाण title=
संग्रहित छाया

मुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र निवडणूक अधिकारी यांचे २०१९ मधील सोशल मीडियाचे काम एका खासगी कंपनीला दिले गेले. ज्या कंपनीला काम दिले ती कंपनी भाजपच्या पदाधिकाऱ्याची होती. भाजप युवा मोर्चाचा आयटी सेलचा हा अधिकारी आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. कारण निवडणुका किती स्वच्छ आणि निष्पक्ष निवडणुका याचा उलगडा होईल. भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियाचे काम दिले, मग निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पडली, असे कसे म्हणता येईल, असा थेट हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

 २०१९मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाचे सोशल मीडियावरील फेसबूक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचं समोर आले आहे. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणं अपेक्षित आहे. परंतु हा प्रकार लोकशाहीमधील मुलभूत तत्त्वांना धक्का पोहोचवणारा आहे, असा थेट आरोप पृथ्वाराज चव्हाण यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर निवडणुकी संदर्भात जनजागृती करण्यासाठी Chief Electoral Officer Maharashtra या नावाने पेज सुरु केले होते. या पेजवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संदर्भात अनेक जाहिराती देण्यात आल्या होत्या. हे पेज तयार करताना वापरकर्त्याने स्वत:चा पत्ता दिला होता. "२०२ प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई". हा पत्ता कोणाचा आहे याबाबत शोध घेतला असता अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणालेत.

फडणवीस सरकारने सरकारच्या प्रसिद्धीच्या जाहिरातीचे काम “साईनपोस्ट इंडिया’ नावाच्या एका जाहिरात कंपनीस दिले होते. उपरोक्त पत्ता या साईन पोस्ट कंपनीचा आहे. हाच पत्ता ‘सोशल सेंट्रल’ नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारेदेखील वापरला गेला आहे. ही कंपनी देवांग दवे याच्या नावावर असून तो भाजपच्या यूथ विंगच्या (BJYM) आयटी आणि सोशल मीडियाचा राष्ट्रीय संयोजक आहे. देवांग दवेच्या वेबसाइटवर त्याच्या कंपनीच्या ग्राहकांची यादी आहे. त्यानुसार त्याची कंपनी ‘द फियरलेस इंडियन’, ‘सपोर्ट नरेंद्र मोदीं’ इत्यादी पेजेसची फाउंडर असल्याचं समोर येतं. ही पेजेस भाजपाचा प्रचार करणारी असून विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल या पेजेसवरून द्वेष पसरवला जातो. त्याशिवाय इतरही काही सरकारी विभागांचे काम त्याच्या एजन्सीकडून केलं असल्याचं त्याच्या वेबसाईटवरून समोर येते, अशी माहिती पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

घटनेच्या कलम ३२४ अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु यासर्व घटनेवरून असे निदर्शनास येत आहे की महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. या सर्व घटनेची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे चव्हाण यांनी केली आहे.