उद्धव ठाकरे - सोनिया गांधी यांच्यात फोनवरुन चर्चा - सूत्र

महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा तिढा कायम आहे.  

Updated: Nov 11, 2019, 05:23 PM IST
उद्धव ठाकरे - सोनिया गांधी यांच्यात फोनवरुन चर्चा - सूत्र title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा तिढा कायम आहे. भाजपने नकार दर्शविल्याने राज्यपालांनी शिवसेनेला विचारणा केली. त्यामुळे शिवसेनेकडे बहुमत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील तिढा सुटण्यासाठी आणि सत्ता स्थापन करण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रसचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई यांनीही अहमद पटेल यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अंतिम निर्णय काँग्रेसचा असणार आहे. आता सोनिया गांधी या काँग्रेस आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर त्या निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यात मोठा पक्ष भाजप असताना त्यांनी सरकार स्थापन करणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, भाजप आणि शिवसेनेत ५०-५० टक्के सत्तेत वाटा मिळण्यावरुन एकमत न झाल्याने तसेच भाजपने हा प्रस्ताव नसल्याचे म्हटल्याने युतीची चर्चा थांबली. शिवसेनासोबत येणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर सरकार स्थापन करण्याचा तिढा वाढला. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेकडे सत्ता स्थापनेची विचारणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीकडे शिवेसनेने प्रस्ताव दिला आहे. तर काँग्रेसकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

दरम्यान, काँग्रेसमधील एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी सुरु आहे. शिवसेनेसाठी सत्ता स्थापनेसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या काँग्रेसकडूनही खलबते सुरु झाली आहेत. दिल्लीत सोनिया गांधी यांच्या दहा जनपथ येथील निवासस्थानी कार्यकारी समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीतून काय निर्णय येणार याचीही उत्सुकता आहे.याबैठकीला खास करुन राजकीय सल्लागार अहमद पटेल उपस्थित आहेत. त्यामुळे पटेल यांची यात भूमिका महत्वाची आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धठ ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे.

शिवसेना - भाजप युतीचा काडीमोडी होण्याची चिन्ह आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे शिवसेना भाजपाप्रणित एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला आता आज रात्री ८ वाजण्याच्या आधी पाठिंबा देणाऱ्या आमदारांचे संख्याबळ सादर करावयाचे आहे. त्यानंतर सत्ता स्थापनेचा शिवसेना दावा करु शकते. त्यामुळे काँग्रेसची भूमिका महत्वाची आहे.