उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; शपथविधीसाठी 'त्या' शेतकऱ्याला आमंत्रण

हे दाम्पत्य शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून निरंकार उपवास करत ८५ किलोमीटर अनवाणी पायाने चालत पंढरपूरला गेले होते.

Updated: Nov 27, 2019, 04:10 PM IST
उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; शपथविधीसाठी 'त्या' शेतकऱ्याला आमंत्रण title=

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी देशभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, या सगळ्या घाईगडबडीत उद्धव ठाकरे यांनी एका व्यक्तीला आवर्जून निमंत्रण पाठवले आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उचलबांगडीची शक्यता

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी संजय सावंत आणि रुपाली सावंत या शेतकरी दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. हे दाम्पत्य शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून निरंकार उपवास करत ८५ किलोमीटर अनवाणी पायाने चालत पंढरपूरला गेले होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर मला जवळ उभे करा, अशी विनंती संजय सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजवर उभे करतो, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. सोशल मीडियावर या प्रसंगाची चांगलीच चर्चाही झाली होती. 

महाराष्ट्र राजकारण : हमाम में सब नंगे...!

महाविकासआघाडीने मंगळवारी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या इच्छेप्रमाणे मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी २८ तारखेला शिवतीर्थावर आयोजित करण्यात ठरले. त्यावेळी उद्धव यांनी संजय सावंत यांची आठवण ठेवून त्यांना अगत्याने निमंत्रण पाठवले. साहजिकच अनेकांकडून उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.  

आतापर्यंत ठाकरे घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने राजकीय पद स्वीकारले नव्हते. त्यांच्याकडून केवळ रिमोट कंट्रोलने सत्तेची सूत्र हलवली जात असत. मात्र, आदित्य ठाकरे आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराणे पहिल्यांदाच प्रत्यक्ष राजकारणाच्या मैदानात उतरणार आहे.