लॉकडाऊन संपल्यानंतर गर्दी होणार नाही असे नियोजन करा – पंतप्रधान

पंतप्रधान मोदी यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

Updated: Apr 2, 2020, 04:42 PM IST
लॉकडाऊन संपल्यानंतर गर्दी होणार नाही असे नियोजन करा – पंतप्रधान title=

मुंबई : १५ एप्रिलपासून लॉकडाऊन एकदम न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्प्याटप्प्यानं नियोजन करा आणि एकदम लोंढे बाहेर येणार नाहीत याची काळजी घ्या, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांना केली. २१ दिवसांची तपश्चर्या वाया जाऊ देऊ नका, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी यांनी आज विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सवरून संवाद साधला. त्यावेळी लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतरच्या नियोजनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे मार्गदर्शन मागितले. त्यावर पंतप्रधान म्हणाले, राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करावे. कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असे समजून लोक रस्त्यावर येतील असे होऊ देऊ नका.

शांती, सद्भाव आणि एकता राखा. कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहील हे पाहा आणि त्यासाठी ड्रोन व अन्य तंत्रज्ञानाचा उपयोग करा, असं पंतप्रधानांनी सांगितलं. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी उगाच पॅकेजची घोषणा करू नका, असा सल्ला पंतप्रधानांनी देशातील मुख्यमंत्र्यांना दिला. केंद्रानं राज्याला द्यावयाचा ११ हजार कोटी रुपयांचा हिस्सा लगेच दिला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील  नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचले असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. याशिवाय राज्यात घोषित लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  सर्व धर्माच्या प्रमुख गुरू आणि धार्मिक नेत्यांना  विनंती करून कोणत्याही परिस्थितीत  गर्दी होणार नाही, तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल, असे आवाहन करण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. या सूचनेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करण्यास सांगितलं. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असण्यासंदर्भात मुख्यमंत्री या कॉन्फरन्समध्ये बोलले होते. त्यालाही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

राज्यातील उपाययोजनांची माहिती

परराज्यातील श्रमिक, कामगार यांची राज्य सरकार पुरेपूर काळजी घेता असून ३ हजार निवारा केंद्रांतून ३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, दोन वेळचे भोजन देत असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली. श्रमिक, कामगारांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठीही यातील तज्ञ, डॉक्टर नियुक्त केले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना देखील आपण आहे तिथेच राहा, तुमची काळजी घेतली जाईल असे सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

आरोग्य यंत्रणा सज्ज

पुढील परिस्थितीच्या नियोजनाचा भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरु केले आहे. महानगरपालिकेची ४ वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंग मधून  एमबीबीएसच्या  विद्यार्थ्यांना आम्ही विशेष कक्षासाठी तयार करीत आहोत. नव्या प्रोटोकॉलप्रमाणे ( मानकाप्रमाणे ) आम्ही लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींचे देखील रुग्णालयाबाहेर विलगीकरण करीत असून त्यासाठी  पालिका अधिकारी आणि पोलिसांच्या देखरेखीखाली लॉजेस, क्लब्स, मंगल कार्यालये ताब्यात घेतले आहेत. पुढे गरज पडल्यास तयारी असावी म्हणून  एखादी मोठी जागा निश्चित करून याठिकाणी आयसोलेशन व क्वारंटाईन सुविधा उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

आमचे पूर्ण लक्ष आम्ही कोरोनाचा प्रसार थांबविण्यावर केंद्रित केले असून पूर्वी चाचणी कमी होत असल्याने रुग्णांची संख्या कमी होती, त्या तुलनेत आता खासगी प्रयोगशाळांना देखील चाचणीची परवानगी दिल्याने आणि त्यांचे दोन तीन दिवसांचे निदान एकदम एकत्रितरीत्या हाती येत असल्याने रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे असे चित्र दिसते. मात्र या रुग्णांना  रुग्णालयांत  दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबई शहरातील महानगरपालिका रुग्णालयात आयसोलेशनसाठी केवळ २८ रुग्णशय्या होत्या त्यामध्ये आता २१००  पर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कोविड रुग्णालये सज्ज

सध्या एकट्या सेव्हन हिल रुग्णालयात १५०० खाटांची सोय फक्त कोविड-१९ साठी निर्माण करण्यात आली असून येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या  निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे येथेही कोविड रुग्णालय उभारत आहोत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली.

<p><iframe allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen="" frameborder="0" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" width="560"></iframe></p>

वैद्यकीय उपकरण उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे

पीपीई किट्स, एन ९५ मास्क, इतर वैद्यकीय उपकरणांची तर गरज आहेच. स्थानिक पातळीवर काही आवश्यक उपकरणे तयार करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे, तसेच त्यांचे उत्पादन प्रमाणित करून मिळाल्यास आपण स्वतःची क्षमता निर्माण करू शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.