'विद्यापीठांच्या जमिनी बळकावण्याचा डाव' देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

विधानसभेतलं भांडण भाजप आणणार रस्त्यावर, सरकारविरोधात आंदोलनाची हाक

Updated: Dec 28, 2021, 10:05 PM IST
'विद्यापीठांच्या जमिनी बळकावण्याचा डाव' देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप title=

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं (maharashtra legislative assembly) आज सूप वाजलं, आजच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विद्यापीठ सुधारण विधेयक मांडलं. विरोधकांनी यावर जोरदार आक्षेप घेत गोंधळ घातला. पण गोंधळातच हे विधेयक मंजूर करुन घेतलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

विद्यापीठांच्या जमिनी बळकावण्याचा डाव? 
आमदार आशिष शेलार यांनी जो आरोप लावला होता, कि यांना विद्यापीठाच्या जमीनी बळकायवच्या आहेत, या आरोपाबाबत आता आम्हालाही सत्यता वाटायला लागली आहे. विदयापीठावर कब्जा करण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यपालांचे अधिकार कमी केले आहेत, आणि विद्यापीठात मनमानी लोकं अपॉईंट करायचं, सर्व प्राधिकरणावर सरकारची सरशी कशी होईल, असा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील विद्यापीठं यापुढे राजकारणाचा अड्डा बनणार आहेत आणि सरकारच्या हातातलं बाहुलं बनणार आहे. आम्ही विरोध करतो म्हणून आम्हाला चर्चाच करु दिली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांना भेटणार, जानेवारीत आंदोलन करणार 
विधानसभेत झालेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती राज्यपालांना देण्यात येणार आहे. तसंच हे विधेयक रोखण्यात यावं अशी मागणी त्यांच्याकडे करणार आहेत. तसंच न्यायलयातही या प्रकरणी दाद मागू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवाय, जानेवारी महिन्यापासून ठाकरे सरकारविरोधात प्रत्येक विद्यापीठात जाऊन भाजप, अभाविपचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.